बेंगळुरू : कर्नाटकात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तणावानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बैठकीत एकत्र येत ‘मतभेद मिटल्याचे’ चित्र निर्माण केले. काँग्रेसनेही दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला. मात्र विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे मत वेगळे असून . त्यांच्यानुसार हा समेट तात्पुरता असून ही परिस्थिती आगामी ‘मोठ्या वादळाची पूर्वसूचना’ असू शकते.
सत्तासंघर्षाला जवळपास महिना उलटला असताना दोन्ही नेत्यांनी शनिवारी सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत एकता दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नेते पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला मान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२३ मध्ये सरकार स्थापन करताना ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनंतर (नोव्हेंबर २०२५ ) मुख्यमंत्रीपद शिवकुमार यांच्याकडे जायचे होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
भाजपा नेते प्रकाश शेषराघवचार यांनी या ‘समेटा’ला तात्पुरता ठप्पा देत म्हटले की, बैठक प्रत्यक्षात मतभेद सोडवण्यासाठी नव्हती, तर केवळ कामकाज सुरळीत ठेवण्यासाठीची औपचारिकता होती. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवकुमार यांचे समर्थक खुलेपणाने त्यांच्यासाठी आवाज उठवत होते, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री मागे हटणे शक्य नाही. त्यांनी ही परिस्थिती स्वतःच निर्माण केल्याने त्यांच्यासमोर ‘करो या मरो’ असे प्रसंग उभे राहिले आहेत.भाजपाने आणखी आरोप केला की काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच गटबाजीचेच नुकसान कर्नाटकमध्येही होणार आहे.
जेडीएसचे एमएलसी टी. ए. शरवण यांनीही दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याला ढोंग म्हणत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेस सरकार विकासकामे करण्यात अपयशी ठरले असून मतभेद लपवण्यासाठी नाटक केले जात आहे. जनता हा दिखावा स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.






