Friday, November 28, 2025

'या' तीन प्रभागातील निवडणूका रद्दचा निर्णय, काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

'या' तीन प्रभागातील निवडणूका रद्दचा निर्णय, काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पुणे: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तारखा जवळ आल्यामुळे सर्व पक्षांचे प्रचार दौरे सुरू आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन प्रभागामधील निवडणूका थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरल्याने राजकीय क्षेत्रातून रोज नव्या बातम्या येत आहेत. मात्र, लोकशाहीच्या उत्सावात काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये पिंपळनेरमधील प्रभाग २, मनमाडमधील प्रभाग १० आणि गेवराईमधील प्रभाग ११ या तीन प्रभागात निवडणुका स्थगित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस कुठलीही स्थगिती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. धुळ्याच्या पिंपळनेर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील पाथरे कुसुमबाई खडू, नाशिकच्या मनमाज नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील नितीन अनिल वाघमारे, बीडच्या गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दूरदानाबेगम सलीम फारूकी यांचे निधन झाल्याने निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत. १९६६ च्या निवडणूक नियम २३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र अध्यक्ष पदासाठी या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात येत नसून ही प्रक्रिया नियोजीत कार्यक्रमानुसार सुरू होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >