महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता ही सध्या खराबहून अति खराब वर्गात पोहोचली आहे. वातावरणात पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. या गोष्टीची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
मुंबईत खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत घसरणाऱ्या ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय)वरून उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा याची अमायकस क्युरी (कोर्टाचा मित्र) म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यात वनशक्ती या पर्यावरणवादी संस्थेतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करत जनक द्वारकादास यांनीही युक्तिवाद केला होता. साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या सुनावणीत एक्यूआय सुधारण्यासाठी एकूण २७ उपाययोजनांची यादी दिली गेली होती. ज्यांचा स्वीकार करत महापालिकेने १२ जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल विचारणा करूनही अद्याप सादर झालेला नसल्याची माहिती गुरुवारी वनशक्तीतर्फे जनक द्वारकादास यांनी न्यायालयाला दिली. याची नोंद घेत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने शुक्रवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापढे तातडीची सुनावणी होणार आहे.
मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० वर
मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे, वाढत्या प्रदूषणामुळे इथल्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २७० या खराब प्रकारात असून, तो ३०० ते ४०० या ‘अत्यंत खराब’ पातळीच्या जवळ पोहोचला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सध्या मुंबईचा एक्यूआय 'खराब' दर्शवण्यात आला असून, पुढील दोन दिवस तो 'खराब'च राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेऊन मास्कचा वापर करणे फायद्याचे ठरेल.
श्वसनाच्या विकारात वाढ
या परिस्थितीमुळे मुंबईकरांना सध्या खोकला आणि घशाचा त्रास जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानात अचानक झालेली घट आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मंदावलेला वेग यामुळे पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. याशिवाय मुंबईत कोस्टल रोडची अखेरची कामं, मेट्रो यांसारखी विकासकामेही युद्धपातळीवर सुरू असल्याने हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे.






