मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतील कलाच्या पात्राची एंट्री आता संपली आहे. या बदलामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर चाहते कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त करत होते. मात्र, मालिकेतून कलाचे जाणे फक्त कथानकाच्या बदलामुळे नव्हे, तर त्यामागे खरं कारण अभिनेत्री इशा केसकरनेच स्पष्ट केले आहे.
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नक्षत्रा मेढेकरची नव्या पात्राची एन्ट्री झाली असून, अनेकांनी गृहित धरणे सुरू केली होती की तिच्या येण्यामुळेच इशा केसकर मालिके सोडत आहे. परंतु खऱ्या कारणाचा उलगडा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला.
इशा केसकरने सांगितले की, सलग दोन वर्ष काम करत असताना जून महिन्यात तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला तिने शूटिंग सुरूच ठेवले, पण दुखापतीच्या गंभीरतेमुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. "विश्रांती न घेतल्यास भविष्यात डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागेल. १५ ते २० दिवस मी सूर्यप्रकाश देखील पाहू शकणार नाही," असे तिने सांगितले. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि सप्टेंबरपासूनच टीमला हे सांगितले होते.
तिने पुढे सांगितले की, मागील काळात तिला चिकनगुनिया आणि अन्नामुळे विषबाधा देखील झाली होती, त्यावेळी टीमने तिची खूप काळजी घेतली. "पुन्हा सुट्टी मागणं मला योग्य वाटले नाही. मालिकेच्या कथेत अडथळा येऊ नये म्हणून मी स्वतः निर्णय घेतला," असेही तिने स्पष्ट केले.
इशा केसकरने शेवटी असे सांगितले की, "आपण मेहनत करून पैसे कमवतो, पण त्याचा आनंद घेता आला नाही तर त्याचा अर्थ काय? म्हणून मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे."






