Tuesday, November 25, 2025

द. आफ्रिकेची स्थिती मजबूत, गुवाहाटी कसोटी अनिर्णित राहणार की भारत हरणार ?

द. आफ्रिकेची स्थिती मजबूत, गुवाहाटी कसोटी अनिर्णित राहणार की भारत हरणार ?

गुवाहाटी : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसा भारताचा पराभव जवळ आल्याचं चित्र अधिक स्पष्ट होत चाललं आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावातही सावध पण प्रभावी खेळ करत भारतासमोर तब्बल ३९५ धावांची मोठी आघाडी उभी केली आहे. मालिकेत मागे पडलेल्या भारतासाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे.

दरम्यान, अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने भारतीय खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजवर नाराजी व्यक्त केली असून, फलंदाजांकडून दुसऱ्या डावात लढाऊ खेळीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेने ४८९ धावांचा मजबूत पाडाव उभारला. सेनुरन मुथुसामीने १०९ धावांचे दमदार शतक ठोकत संघाला मजबूत पाया दिला, तर मार्को यानसेनने ९३ धावांची झंझावाती खेळी करून भारतावर प्रचंड दडपण आणले.

पहिल्या डावात भारताचा डाव २०१ धावांवर कोसळला. त्यानंतर ऋषभ पंतचा फोटो शेअर करत अश्विनने ‘दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून सामना स्पर्धेत आणावा’ अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, “मैदानावरील बॉडी लँग्वेज चिंताजनक आहे” असे म्हणत त्याने ब्रोकन हार्टचे इमोजी पोस्ट करत चिंता व्यक्त केली.

तीन डावांच्या खेळीत भारताच्या फलंदाजीत सातत्याचा पूर्णतः अभाव दिसून आला आहे. केवळ यशस्वी जैस्वालनेच ५८ धावांचे अर्धशतक झळकावून प्रत्युत्तर दिले. कोलकात्यातील पहिल्या कसोटीत भारताला केवळ १२४ धावांचे लक्ष्यही पार करता आले नव्हते. आता गुवाहाटी सामना ड्रॉमध्ये गेला तरी दक्षिण आफ्रिका मालिका जिंकणार हे निश्चित आहे.

दुसऱ्या डावात जोखीम न घेता बाद न होता खेळण्यावर आफ्रिकेने भर दिला आणि त्यांची आघाडी ४०० धावांच्या पुढे गेली. भारताला फॉलोऑनपासूनही बचाव करता आला नाही. भारतीय मैदानावर शेवटच्या डावात ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य पार करण्याचा पराक्रम आजवर कुणालाही जमलेला नाही.

दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ३० धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटीतही भारताची स्थिती डळमळीत दिसतेय. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते मालिकेत २-० असा निव्वळ विजय मिळवून ‘क्लीन स्वीप’ नोंदवतील.

Comments
Add Comment