ढाकामध्ये झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनी तैपेई संघाला पराभूत केले. भारताने चीनी तैपेई संघाला ३५-२८ अशा फरकाने मात देत वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय महिला संघाच्या या विजयानंतर सध्या त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली होती. सुरुवातीला चीनी तैपेईने भारताच्या बचावाला आव्हान दिले होते. पण भारतीय बचावपटूंनी चांगले टॅकल केले. तसेच चढाईपटूंनीही मोक्याच्या क्षणी पाँइंट्स मिळवले.
पहिल्या हाफमध्ये सामना चुरशीचा सुरू असतानाच शेवटचे काही क्षण उरले असताना संजू देवीने केलेल्या सुपर रेडने सामन्याला कलाटणी दिली. भारताने तिथून मिळवलेली लय कायम ठेवली. त्यामुळे भारतीय महिला संघाला विजेतेपद जिंकणे सहज सोपे गेले. मात्र या सामन्यात भारताची कर्णधार रितू नेगी टॅकल करताना दुखापतग्रस्त झाली होती. पण भारतीय संघाने हार न मानता तिच्या अनुपस्थिततही उर्वरित सामन्यात चांगला खेळ केला.
भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित
या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. भारताने साखळी फेरीतही चारही सामने जिंकले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला होता. चीनी तैपेई संघाने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेश संघाला २५-१८ अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. दरम्यान भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे २०२५ वर्षातील तिसरे मोठे विजेतेपद आहे. भारतीय संघाने मार्चमध्ये आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.