Saturday, November 22, 2025

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे घेण्यात आला असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यांनी उपस्थित होते.

फडणवीस यांनी यावेळी दिल्लीतील स्फोटाबद्दल भाष्य केले. दिल्लीत घडवून आणलेला स्फोट हा केवळ एक संकेत होता, प्रत्यक्षात देशभरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची पाकिस्तानची योजना होती, असे ते म्हणाले. भारताच्या तपास यंत्रणांनी वेळेवर कारवाई करत जवळपास ३००० किलो आरडीएक्स जप्त केले आणि या कटाला मूळापासून आळा घातला, असा दावा त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानला भारताविरुद्ध थेट युद्धात पराभव स्वीकारावा लागेल, हे त्यांना माहीत असल्याने ते छद्म युद्धाच्या माध्यमातून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतात. दिल्लीतील स्फोट हा त्यांच्या अस्तित्वाचा दावा करण्यासाठी केलेला प्रयत्न होता, मात्र भारतीय तपास यंत्रणांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे देशातील अनेक शहरांवरील दहशतवाद्यांचा डाव उधळला गेला."धोका अद्याप कायम आहे. पाकिस्तान अशा घटना घडवून जागतिक स्तरावर स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत राहील. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज आहे," असे आवाहन त्यांनी केले.

२६/११ च्या हल्ल्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तो हल्ला फक्त ताज किंवा ट्रायडेंट हॉटेलांवर नव्हता; तर भारताच्या आर्थिक राजधानीवर आणि सार्वभौमत्वावर लावलेलं थेट आव्हान होतं. जशी ९/११ मध्ये ट्विन टॉवरवर हल्ला करून अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रयत्न भारताविरुद्ध करण्यात आला होता.त्यांनी पुढे सांगितले की, २६/११  नंतर भारताने धाडसी पावलं उचलली असती, तर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती. मात्र, मोदी सरकारच्या काळात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ठोस भूमिकेतून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही, हे स्पष्ट करत भारतीय सैन्याला कारवाईसाठी मोकळीक दिली. त्यानंतर भारतीय तीनही दलांनी पाकिस्तानच्या तळांवर घुसून अचूक कारवाया केल्या आणि त्यावर पाकिस्तान काहीही प्रतिकार करू शकला नाही.

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात भारताची लष्करी क्षमता अधोरेखित झाली आहे, पण हा संघर्ष अद्याप संपलेला नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान छुप्या मार्गाने भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न पुढेही करेल; त्यामुळे सतर्कता हीच सर्वात महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा