जीवनगंध : पूनम राणे
रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. मीनल आणि तिची बहीण शीतल संध्याकाळी पाचच्या दरम्यान बागेत फिरायला जायचे नियोजन करत होत्या. शाळेतील अभ्यास पूर्ण करून दोघींनी संध्याकाळी फिरायला जाण्याचा बेत पक्का केला. दोघी निघाल्या, आई मात्र दारात उभी राहून अंधार पडायच्या आत लवकर या, असे सांगत होती. दोघी तयारी करून निघाल्या. रिक्षात बसल्या. काका, ‘डायमंड गार्डन.’ रिक्षावाले काका म्हणाले, ‘अगं, तुमच्याबरोबर कोणी मोठी माणसं नाहीत का?’ दोघीच गार्डनला जाणार! हो, काका, आमच्यावर आमच्या पालकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे फिरायला जायचं असेल, तर आम्ही दोघीच जातो. आई-बाबांना इतर काही काम असल्यामुळे ते दोघेजण आमच्या सोबत येऊ शकत नाहीत.
दोघीही बागेत पोहोचल्या. बागेमध्ये विविध रंगांची फुलझाडे फुललेली होती. पक्षी गाणे गात होते. वारा सुटल्यामुळे पानांची सळसळ ऐकू येत होती. त्यामुळे मनाला प्रसन्न वाटत होते.
त्या बागेत खूप लहान मुले खेळत होती. हवेत गारवा होता. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. इतर मुले आपल्या आई-वडिलांसोबत खेळायला आली होती. मीनल आणि शीतल फिरत असताना त्यांना दिसले की, एक आजी आपल्या नातवासोबत खेळते आहे. या दोघींना पाहुन आजीला फारच आनंद झाला. आजीने आपल्या नातवाला खेळायला सोडून ती बाकावर जाऊन बसली. मीनल व शीतल आजीजवळ बसल्या.
आजीने दोघींना चॉकलेट देऊ केले; परंतु मीनलने चॉकलेट घेतले नाही. ती म्हणाली, ‘माझी आई म्हणाली, कोणी काही दिलं, तर घ्यायचं नाही.’ त्यावर आजी म्हणाली, ‘अगं तुझ्या आईने तुम्हाला छान शिकवलं आहे.’ तिने सांगितलेली गोष्ट खरी आहे.
या जगात फार सावधपणे वागायला हवं कारण जग बदललेलं आहे; परंतु प्रत्येक व्यक्ती तशी नसते. आपण जाणून घ्यायचे असते. ‘तुमची आई म्हणते, तशी मी नाही.’ मीही माझ्या नातवाला घेऊन इथे आली आहे.
त्यानंतर मीनलने व शीतलने आजीने दिलेले चॉकलेट घेतले. गप्पा मारल्या. आजी कुठे राहते हे विचारून घेतलं. आजीने आपल्या नातवाला आवाज दिला. अमेय आजीच्या आवाजाने ताबडतोब धावत आला. आजी म्हणाली ,‘हे बघ तुला दोन मैत्रिणी मिळाल्यात. पुढच्या रविवारपासून त्या नेहमीच येणार आहेत. शीतलने आजीला गोष्ट सांगण्याची विनंती केली.आजीने आपल्या नातवाला व त्या दोघींना गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिघेही गोष्ट ऐकण्यात दंगून गेले होते. तोपर्यंत सात वाजले होते. दोघींनी आजीला नमस्कार केला व निघाल्या.
आजी म्हणाली, ‘पुढच्या रविवारी मी येणार आहे. तेव्हा तुम्ही दोघीजणींनी एक, एक गोष्ट मला सांगायची. यावर दोघींनी मान हलवली आणि पुढच्या रविवारी नक्की भेटू. असे वचन आजीला दिले आणि आपली मैत्री कायम ठेवू.’ अशाप्रकारे एक मैत्रीण मीनल व शीतलला भेटली होती.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन त्या ग्रंथालयात गेल्या. ग्रंथालयातून गोष्टीचे पुस्तक घेतले. त्यांना रविवारी आजीला गोष्ट सांगायची होती. घरी येऊन दोघीही गोष्टीचे पुस्तक वाचत बसल्या. आईने विचारलं, ‘अगं काय वाचता!’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘अगं, आई, बागेत आजी भेटल्या होत्या. त्यांना गोष्ट सांगायची आहे रविवारी. आपल्या मुलींना चांगली मैत्रीण भेटली याचा आनंद आईला झाला.
तात्पर्य :- मैत्री ही कधीही कुणाशीही होऊ शकते मैत्रीला वयाचे बंधन नसते.