मुंबई (खास प्रतिनिधी): जाहीर करण्यात आलेल्या ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. परंतु ही लॉटरी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे निश्चित पालिकेने केले आहे. मात्र ही सोडत अनिश्चित काळासाठी स्थगित केली असली तरी सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या सर्व घरांसाठी २०३७ जणांनी अर्ज भरले आहेत.
विकास नियंत्रण नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱ्या विकासकांडून महापालिकेला प्रिमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. ताब्यात आलेल्या घरांपैंकी ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. महापालिकेकडून प्रथमच म्हाडाच्या धर्तीवर लॉटरी काढून अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबरला पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढण्याचे निश्चित केले होते. परंतु ही सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे.
यासाठी घरे महागडी असतानाही २०३७ अर्ज प्राप्त झाले. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे पालिकेने निश्चित केले असले तरी पुढील आठवड्यात सोडतीची तारीख जाहीर केली जाणार आहे, असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
कोणत्या ठिकाणी किती अर्ज
प्रेस्टिज भायखळा – ४२ घरांसाठी ११२ अर्ज
एलबीएस मार्ग भांडूप (प) – २४० घरांसाठी १२९ अर्ज
१६/ए मरोळ- अंधेरी (पू) – १४ घरांसाठी ९३७ अर्ज
माजासगाव, जोगेश्वरी (पू) – ४६ घरांसाठी ३९३ अर्ज
त्रिलोक पार्क, कांदिवली (प) – ४ घरांसाठी ८३ अर्ज
स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू) – १९ घरांसाठी १८९ अर्ज
कांदिवली (प) – ३० घरांसाठी ११५ अर्ज
कांजूर -आदि अल्लूर – २७ घरांसाठी ५५ अर्ज
सागर वैभव सोसायटी कांदिवली – ४ घरांसाठी २४ अर्ज






