जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच'
नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत तीन भारतीय महिलांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यापैकी रोहतक जिल्ह्यातील एका गावातील ऑटो चालकाची मुलगी मीनाक्षी हुड्डा आहे. प्रीती पवार आणि अरुंधती चौधरी यांनीही भारताच्या नावावर सुवर्णपदके मिळवली आहेत.
ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग कप मध्ये भारताच्या मुलींनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे. या स्पर्धेत तीन भारतीय महिला बॉक्सर्सनी सुवर्णपदके जिंकली. ४८ किलो वजनी गटात भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडणारी मीनाक्षी हुड्डा ही पहिलीच खेळाडू होती. बॉक्सिंग कपच्या अंतिम सामन्यात तिने उझबेकिस्तानच्या फरझोना फोझिलोवाचा ५-० असा पराभव केला.
मीनाक्षी ही रोहतक जिल्ह्यातील रुरकी या छोट्याशा गावातून येते. तिचे कुटुंब साधे आहे आणि तिचे वडील अजूनही ऑटोरिक्षा चालवतात. तिच्या या कामगिरीनंतर मीनाक्षी हुड्डा भावुक झाली आणि तिने सांगितले की तिचे वडील अजूनही ऑटोरिक्षा चालवतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरही त्यांनी रिक्षा चालवणे सोडलेले नाही.
तिच्या वडिलांचा असा विश्वास आहे, की आज त्यांची मुलगी जे काही आहे ते तिने केलेल्या कठोर परिश्रमामुळे आहे. ऑटोमधूनच त्यांच्या मुलीने रिंगपर्यंतचा प्रवास केला. यापूर्वी, मीनाक्षीने २०२२ च्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, आशियाई स्पर्धेत रौप्यपदक आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. मीनाक्षी आयटीबीपीमध्ये देखील तैनात आहे. आशियाई स्पर्धेत तिच्या प्रभावी कामगिरीनंतर, तिला इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये तैनात करण्यात आले.
१५ भारतीय मुष्टियोद्धांचा अंतिम फेरीत प्रवेश मीनाक्षी व्यतिरिक्त, प्रीती पवारने ५४ किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तिने २०२५ च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या सिरीन चाराबीला हरवून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर अरुंधती चौधरीने ७० किलो वजनी गटात भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले. अरुंधतीने उझबेकिस्तानच्या अजीजा झोकिरोवाला हरवून या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. १५ भारतीय बॉक्सर्सनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पुढील सत्रात सर्वांच्या नजरा निखत जरीन आणि जास्मिन लांबोरिया यांच्यावर आहेत.






