महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय नाही
मुंबई (खास प्रतिनिधी) : वायू प्रदूषण नियंत्रण उपायांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईत महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने २०० पेक्षा अधिक राहिल्यास त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-४’ (ग्रॅप-४) अंतर्गत बंद करण्यात येतील, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त यांनी या बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या आणि यथोचित कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छ इंधनावर बेकरी तसेच स्मशानभूमीचे क्रियान्वयन, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने रस्त्यांवर पाणी फवारणी आदी बाबींचा समावेश आहे.
याच अनुषंगाने, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपड्याचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोड्याची शास्त्रशुद्ध साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
याच पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये विभाग स्तरावरील दोन अभियंता आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश राहील. त्यांच्यासमवेत व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीमसह (व्हीटीएमएस) वाहन कार्यरत राहील. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्दे समाविष्ट असलेली मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी, संवेदन (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता देखरेख संयंत्र आणि एलईडीचे क्रियान्वयन योग्यप्रकारे होत असल्याचे सुनिश्चित करणे. तसेच, कचरा जाळणे, इंधनाच्या स्वरुपात लाकूड जाळण्यावर प्रतिबंध घालणे आदी कार्यवाही या पथकाकडून करण्यात येईल. तसेच, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईही त्यांच्याकडून केली जाईल. नागरिकांनी वायू प्रदुषणास कारक ठरतील असे कृत्य करणे टाळावे आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






