मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात. एखादा खोटा डिलिव्हरी मेसेज, छोट्या पेमेंटची मागणी करणारी एक लिंक किंवा ओटीपी मागणारा कॉल एवढ्यानेही आपण त्यांच्या डिजिटल सापळ्यात अडकत असल्याचे फेडएक्सने निदर्शनास आणले.
जर तुम्हाला नुकताच एखादा मेसेज किंवा व्यवहार संशयास्पद असल्याचे जाणवले असेल, तर तुम्ही असे काय केले पाहिजे, जे योग्य असेल, झटपट कार्यवाही केल्यामुळे नुकसान कमी करता येते आणि इतरांचे रक्षण करता येते.
'फेडएक्सचा' सल्ला आहे की जर एखादा ठग संशयास्पद नंबर, ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत असेल, तर सर्वप्रथम त्या संवादाला तात्काळ पूर्णविराम द्या आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता संबंधित अकाउंट ब्लॉक करा. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, कार्ड नंबर, पासवर्ड किंवा कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नये.
आणि जर ती चुकून शेअर झाली असेल, तर लगेच आपल्या बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक किंवा खाते फ्रीझ करून घ्यावे.
याशिवाय, संशयास्पद संदेश, ईमेल, ट्रान्झॅक्शन आयडी आणि संपर्क क्रमांकांचे स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवावेत, कारण ते पुढील तपासणी आणि तक्रार प्रक्रियेत अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच, आपल्या बँक आणि युपीआय अँपमधील अलीकडील सर्व व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक आहे. जर कुठलीही संशयास्पद नोंद आढळली, तर संबंधित अँपद्वारे त्वरित तक्रार नोंदवा किंवा कस्टमर केअरला कळवा.
कुठे आणि कशी करावी तक्रार ?
फेडएक्सच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या प्रसंगी त्वरित तक्रार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम १९३० या राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाइनवर कॉल करावा, जी वित्तीय फसवणूक प्रकरणांमध्ये तत्काळ मदत उपलब्ध करून देते.
तसेच, सायबरक्राईमडॉटजीओव्हीडॉटइन या संकेतस्थळावर 'रिपोर्ट अदर सायबर क्राईम' या विभागात फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक किंवा बनावट ओळख (इम्पर्सोनेशन) यांसारख्या प्रकरणांची तक्रार नोंदवता येते. याशिवाय, आपल्या बँक किंवा युपीआय अँ (गूगल पे, फोनपे, पेटीएम) यांना ताबडतोब कळवावे, कारण या सर्व प्लॅटफॉर्मवर ‘रिपोर्ट फ्रॉड’ हा पर्याय उपलब्ध आहे आणि त्याचा त्वरित वापर करणे गरजेचे आहे.
जर आर्थिक नुकसान गंभीर असेल, तर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करावी, जेणेकरून पुढील तपास जलदगतीने पुढे जाऊ शकेल.
घोटाळा जितक्या लवकर पकडता येईल तितके चांगले, पण त्याची तक्रार नोंदवल्यामुळे इतरांना त्या सापळ्यातून वाचायला मदत होते.
घोटाळेबाज बऱ्याचदा आपले लिखाण, लिंक आणि संपर्क नंबर वेगवेगळ्या शहरांत आणि प्लॅटफॉर्म्सवर पुन्हा पुन्हा वापरतात. त्यामुळे तुम्ही केलेली झटपट कृती पुढे बळी पडणाऱ्या संभाव्य व्यक्तीला वाचवू शकते. भारताच्या सायबर प्रतिसाद प्रणाली आता खूपच सशक्त आहेत. पण केव्हाही, जागरूकता हाच आपला पहिला बचाव असतो.






