Wednesday, November 19, 2025

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका

नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबध विकोपाला गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचा थेट परिणाम विमान कंपन्यांवर होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियासहित अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास वेळ तीन तासांपर्यंत वाढला असून इंधन खर्चात २९% वाढ झाली आहे.

एअरस्पेस बंदीमुळे एअर इंडियाला वर्षाकाठी ४५५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ३ हजार ८०० कोटी इतके नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान २०२४-२५ मधील ४३९ मिलियन डॉलरच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या आर्थिक ताणातून सुटण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे चीनच्या शिनजियांग प्रांतातील हॉटन, काश्गर, उरुमकी मार्गे ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ मिळण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य झाल्यास अमेरिका, कॅनडा आणि युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांचे अंतर कमी होईल. यामुळे प्रवासाच्या कालावधीत बचत होईल आणि इंधन खर्चातही मोठी कपात होईल.

लांब पल्ल्याचा प्रवासात तीन तासांनी वाढ, इंधन खर्चात २९ टक्के वाढ, वर्षाला ३,८००  कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज

चीनच्या शिनजियांग प्रांतातील ‘इमर्जन्सी एअर एक्सेस’ची मागणी

एअर इंडियाच्या मागणीला चीन मान्यता देण्याची शक्यता कमी एअर इंडिया मागत असलेला शिनजियांगचा रुट जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमधून जातो. येथे पर्वतांची उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रात डीकंप्रेशनचा (केबिनमधील वायुदाब अचानक कमी होणे) धोका अत्यंत गंभीर मानला जातो. यामुळे, प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण, खिडक्या वा दरवाजे अचानक उघडणे, विमानाच्या संरचनेला नुकसान होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ही जोखीम पाहून अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स हा मार्ग टाळतात. याशिवाय हा भाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी वेस्टर्न थिएटर कमांडच्या अधिकारात येतो. त्यामुळे हा संवेदनशील ‘मिलिटरी एअरस्पेस’ आहे. अशा परिस्थितीत, चीन या मार्ग वापरण्याची परवानगी देईल का? असा प्रश्न आहे.

Comments
Add Comment