मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जरी करण्यात आला असून, लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचली नसेल, तर त्यासाठी संपर्काची योग्य माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून या हप्त्याचे वितरण सुरू केले. सुमारे अठरा हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.
जर तुम्ही लाभार्थी यादीत असल्याची खात्री असूनही २१ वा हप्ता मिळाला नसेल, तर मदतीसाठी पुढील मार्गांचा वापर करू शकता:
संपर्कासाठी हेल्पलाइन
ई-मेल: pmkisan-ict@gov.in
हेल्पलाईन क्रमांक: 155261, 1800-11-5526 (टोल-फ्री), 011-23381092
या माध्यमातून तुम्हाला अर्ज व हप्ता संबंधित समस्या, सुधारणा आणि मार्गदर्शन मिळू शकते.
तुमचा हप्ता आला नसेल तर काय करावे ?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmkisan.gov.in
"शेतकरी कॉर्नर" मध्ये जाऊन "लाभार्थी स्थिती" (Beneficiary Status) निवडा.
तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासा.
नोंदणी क्रमांक माहित नसल्यास "नो युअर रजिस्ट्रेशन नंबर" पर्याय वापरून तो मिळवू शकता.
कॅप्चा व OTP भरल्यानंतर तुम्हाला पैसे का आले नाहीत याची अचूक माहिती दिसेल.
काय आहेत पैसे थांबण्याची कारणे?
eKYC पूर्ण नसणे
बँक खात्यातील त्रुटी किंवा खाते–आधार लिंक नसणे
अर्ज करताना दिलेली चुकीची माहिती
आधार क्रमांक किंवा खाते क्रमांकातील तांत्रिक विसंगती
वरील त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुढील हप्त्यापासून तुमच्या खात्यात पैसे नियमित येऊ लागतील.
योजनेअंतर्गत २१ व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याची माहिती शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे देखील पाठवण्यात येत आहे.






