मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रावर केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण भारतातील हवामानही अस्थिर आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याचं भाकीत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. पुण्यातही किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी 4 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी आणि पहाटे गारवा वाढला आहे. हवेत कोरडेपणा जाणवू लागला असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसासोबत थंडीची लाटही नागरिकांना जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यातील हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.






