मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कसोबत हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार आहे.
या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांतर्गत, मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हाय-स्पीड रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस.व्ही.रोड वरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब कमी होईल, अवजड वाहनांची हालचाल भुयारी रस्ता रस्ता वळवली जाईल आणि शहरात वाहतूक कोंडी कमी होईल.
टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआर अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. निवडलेला सल्लागार भूगर्भीय, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास करून मार्गाची रचना तयार करेल आणि एमएमआरडीएला निविदा व्यवस्थापन प्रक्रियेत तांत्रिक सहाय्य देईल. स्मार्ट आणि शाश्वत मुंबईकडे निर्णायक पाऊल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भुयारी रस्ता नेटवर्क मुंबईचे भूमिगत एक्स्प्रेसवे ठरेल.
या भुयारी मार्गाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून रूपांतर तिच्या कार्यक्षम वाहतूक प्रणालीवर अवलंबून आहे. प्रस्तावित भुयारी रस्ता नेटवर्क हे बहुपातळी जोडणीच्या दिशेने मोठे पाऊल आहे.”
भुयारी रस्ता नेटवर्कच्या अंमलबजावणीचे टप्पे
- पहिला टप्पा : वरळी सी लिंक- बीकेसी- विमानतळ लूप सुमारे १६ किमी)
मुंबई कोस्टल रोडला बीकेसी आणि विमानतळाशी जोडणारा मार्ग, तसेच मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरशी एकत्रित होणारा भाग. या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग व एस. व्ही. रोडवरील कोंडी कमी करण्यावर भर असेल. - दुसरा टप्पा : पूर्व–पश्चिम जोडणी (सुमारे १० किमी)
पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडून क्रॉस-शहर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करणे. - तिसरा टप्पा : उत्तर–दक्षिण जोडणी (सुमारे ४४ किमी)
संपूर्ण मुंबईभर अखंड भूमिगत मार्ग तयार करून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवी जोडणी उभारणे.
“भुयारी रस्ता नेटवर्कमुळे मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे नेटवर्क विद्यमान रस्त्यांवरील ताण कमी करून पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणी सशक्त करेल तसेच नव्या नागरी जागा उपलब्ध करून देईल.सध्या या प्रकल्पाचा फक्त सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे, ज्यामध्ये तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाईल. डीपीआर अंतिम होऊन मंजूर झाल्यानंतर, प्रकल्पाची अंमलबजावणी वाहतुकीच्या गरजेनुसार आणि टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.” - डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त, एमएमआरडीए