आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले
मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली. त्यामुळे अखेर याविरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर केले. पण कुलाबा कॉजवेवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर नागरिकांच्या मागणीनुसार आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जर कारवाई होत असेल तर मग दादर, घाटकोपर, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पूर्व आदींसह इतर भागांमधील वाढत्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. लोकप्रतिनिधीही याची मागणी करत असतानाही कॉजवे प्रमाणे इतर विभागांमध्ये महापालिकेचे अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर आणि बीएमसी अधिकाऱ्यांना ए वॉर्ड ऑफिसबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कुलाबा कॉजवे वरील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करून बुधवारी ६७ बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत कुलाबा रहिवाशांसह नार्वेकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ही कारवाई पुढेही कायम राहिली पाहिजे अशी मागणी केली. यासाठी महापालिकेला एक आठवड्याची मुदत देण्यात आली. या बैठकीत कुलाब्यातील सुमारे १५-२० रहिवाशी उपस्थित होते, महापालिका उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आणि ए वॉर्डचे प्रभारी जयदीप मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका कार्यालयावर करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
कुलाब्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे रहिवाशी त्रस्त असल्याने नार्वेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने धडक कारवाई केली. परंतु अशीच समस्या दादर पश्चिम आणि पूर्व दिशेला तसेच गोरेगाव, कांदिवली,मालाड.घाटकोपर,वांद्रे पूर्व, कुर्ला, मालाड, भांडुप, मुलुंड आदी भागांमध्ये असून रहिवाशांच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधींकडून तक्रार करून तसेच आंदोलनाचा इशारा देवूनही महापालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. दादर परिसरात रेल्वे स्थानकाला विळखा घातला जात असतानाही महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दादरची जनता प्रचंड त्रस्त आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.






