Saturday, November 8, 2025

शो मस्ट गो ऑन...

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल

दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे कलावंत म्हणजे जयराज नायर. जयराज यांचा जन्म परळचा, ते लहानाचे मोठे तेथेच झाले. नायगावच्या लोकसेवा विद्यालयातून त्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले. तेथील गणेशोत्सव मंडळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये ते सहभागी व्हायचे. ते राहत होते, त्यांच्या बाजूला आंबेकर नगर होते. तेथील मुले एकांकिका बसवायची, ती त्यांना एकांकिकेमध्ये काम करण्यासाठी बोलावत असत. तेथे शाहीर साबळे राहत असत. त्यांच्या एकांकिका पाहायला शाहीर साबळेंच्या कन्या चारुशीला साबळे यायच्या. शाहीर साबळेंचे चंद्रकांत तांबे नावाचे मॅनेजर होते, एकदा ते त्यांना शाहीर साबळेंकडे घेऊन गेले. अशा प्रकारे त्यांचा शाहीर साबळेंच्या ग्रुपमध्ये प्रवेश झाला. तो त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.

शाहीर त्यांना दौऱ्यावर घेऊन गेले. तेव्हा कोंडू हवालदार हे मुक्त नाट्य होते. त्यामध्ये मधू कडू, माया जाधव हे कलावंत काम करायचे. रंगमंचावर छोटा प्रवेश करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतरच्या एका नाटकात मद्रासी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. बापाचा बाप, नशीब फूटकं सांगून घ्या. या मुक्त नाटकांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. राजा मयेकर व शाहीर साबळे भारुड करायचे, त्यानंतर चंद्रकांत जाधव व शाहीर साबळे भारुड करू लागले. एक दिवस फलटणला गाण्याचा शाहिरांचा एका तासाचा कार्यक्रम होता; परंतु तिथे गेल्यावर त्यांना सांगण्यात आले की दोन तासांचा कार्यक्रम करा. त्यावेळी हरिश्चंद्र सावंत शाहिरांना म्हणाले की, तुम्ही आबुराव, बाबुराव का नाही करत? शाहिरांनी जयराजला ते करायला सांगितले. जयराजच्या मनात शंका आली की स्टेजवर शाहिरांना अरे तुरे कसे करायचे? परंतु शाहिरांनी जयराजला सांगितले स्टेजवर गेल्यावर कोणीही कलाकार छोटा नसतो की, कोणीही कलाकार मोठा नसतो. अखेर त्यांनी आबुराव बाबुराव चांगल्या पद्धतीने साकारला व शाहिरांची पसंती मिळवली. विंचू चावला हे भारुडदेखील त्यांनी केले. कधी आबुरावचं लगीन ते त्यांच्यासोबत करीत होते. त्यानंतर त्यांची नाईट वाढली.

चारुदत्त दुखंडे हे कॅमेरामन जयराजचे क्लासमेट होते. 'हीच खरी दौलत' या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबासाहेब फत्तेलाल व निर्माते होते विश्वास सरपोतदार. मल्टीस्टार कास्ट असलेला हा चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये एका छपरी मुलाची भूमिका होती, जो त्या चित्रपटातील नायिका कामिनी भाटियाच्या मागे लागतो, नंतर ती त्याला तिचा प्रियकर अशोक सराफकडे घेऊन जाते. अशोक सराफ त्याची धुलाई करतात. ही भूमिका त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साकारली. अशा प्रकारे त्यांचा मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. तो देखील त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. त्याच दरम्यान त्यांची ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याची भेट झाली.

शाहीर साबळेमुळे त्यांनी शिवाजी मंदिरचा रंगमंच पाहिला. त्यांचा नाट्यसृष्टीत प्रवेश झाला. 'एक नट आणि अनेक सम्राट' हे शाहिरांच नाटक त्यांनी केलं होतं. केदार शिंदेचं बालपण जयराजनी पाहिलं होतं. केदार त्यांना मामा म्हणत असे. जयराजजींची गरवारे पेंटची कंपनी बंद पडलीं होती. केदारनं त्यांच्यासाठी भूमिका तयार केली आणि त्यांना' सही रे सही 'या नाटकात घेतलं. त्याचे प्रयोग आजपर्यंत सुरू आहेत. दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्यांना दिशा, सही, पपिहा, शाहजहान या आर्ट चित्रपटांमध्ये घेतलं. दिशामध्ये नाना पाटेकर, सयाजी शिंदे होते. पपिहा चित्रपटामध्ये चंदूपारखी, तर साजमध्ये शबाना आजमीसोबत त्यांनी काम केले. अशा प्रकारे जवळपास ५० ते ६० चित्रपट त्यांनी केले. 'तू माझा किनारा' हा देखील त्यांचा चित्रपट आहे. त्यामध्ये त्यांनी रिटायर्ड कर्नलची भूमिका केली आहे. त्यांची मुलगी घर सोडून निघून जाते. शेजारी असलेल्या लहान मुलीवर त्यांचा जीव जडतो. केतकी नारायण व भूषण प्रधान या चित्रपटामध्ये आहे. बाळुमामांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये त्यांनी बाळुमामाची भूमिका केली. लोक येऊन त्यांच्या पाया पडायचे. सध्या त्यांचे सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, मोरूची मावशी ही नाटके सुरू आहेत. काही त्यांचे चित्रपट येणार आहेत. केदार शिंदेंचा 'अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई? ' या आगामी चित्रपटात देखील ते आहेत. सतत काम करीत राहणे त्यांना आवडते.

Comments
Add Comment