मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला. या साखरपुड्याच्या सोहळ्याबद्दल आता चर्चा रंगू लागली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अनावश्यक लग्नातील खर्चावर टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा आरोप मुंबई डब्बेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला.
या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिल. मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर जवळ असलेल्या 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र शाही सोहळ्याच्या खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका सुरु झाली आहे.
लोकांना दखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्य पद्धतीने करा, सध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात. असा सल्ला इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून दिला होता. दुसरीकडे, दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशी टिका मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.
मात्र इंदुरीकर महाराज यांना अश्या प्रकारची टीका टीका होणार हे माहित असल्याने त्यांनी कार्यक्रमात याबाबत स्पष्टीकरण दिलं. "वीस वर्ष लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवला आहे. करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस हा वारकऱ्या सारखा ठेवला. सगळ्यांना सामान वागणूक. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुर्ची नाही. फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही कोणाची स्तुती केली नाही, कोणाची निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो, " असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिल. "व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकला आहे. तुम्हाला नाव ठेवायचं तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे. "असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.






