मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले मेट्रोचे जाळे आता विस्तारत जात आहे. आणि त्याला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या भुयारी मेट्रोला ही मुंबईकरांनी पसंती दर्शवली. मात्र आता हा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकार मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. दरवाढ लक्षणीय असेल, तर मुंबईकरांना इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. सध्या मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांवर 3 ते 12 किलोमीटर प्रवासासाठी 20 रुपये भाडे आकारले जाते, तर भुयारी मेट्रोसाठी हेच अंतर 40 रुपयांपर्यंत जाते. मेट्रो 1 वरही 8 ते 11.4 किलोमीटरसाठी 40 रुपये आकारले जातात.
दरवाढ कोणत्या मार्गिकांसाठी होणार?
राज्य सरकारने मेट्रोच्या भाडे निर्धारण समितीच्या स्थापनेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे मेट्रो 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि मेट्रो 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील भाडेवाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. एमएमआरडीएने हा प्रस्ताव मागील ऑगस्टमध्येच राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्यास मंजुरी देऊन केंद्राच्या सॉल्ट पॅन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली भाडे निर्धारण समिती स्थापन केली जाणार आहे.
दरवाढीमागील कारण काय आहे?
सध्या एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवर दररोज सुमारे 3 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी प्रवासी संख्या 9 लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रवासी संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने उत्पन्नात तुटवडा जाणवतो आहे, आणि खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच, मुंबईतील इतर मेट्रो मार्गिकांचे भाडे या मार्गिकांपेक्षा जास्त आहे. या तफवातीबरोबरच वाढत्या आर्थिक तुटीमुळे मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासन गांभीर्याने विचारात घेत आहे.






