Thursday, November 6, 2025

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद

कॅरारा : भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी-२० सामन्यात ४८ धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने सामन्यात विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकले. यासह भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी करह केला असून वॉशिंग्टन सुंदरने ३ बळी घेत आपल्या फिरकी गोलंदाजीचा अंदाज दाखवला. त्याचप्रमाणे अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप, बुमराह व वरूणने १-१ विकेट घेतल्या.

क्विन्सलँडला झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने १६८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. पण ऑस्ट्रेलियाला १८.२ षटकात सर्वबाद ११९ धावाच करता आल्या. भारतीय फिरकीपटूंनी या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच सतावले. त्यामुळे सखोल फलंदाजी असतानाही ऑस्ट्रेलियाला भारताने दिलेल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. पण ५ व्या षटकात मॅथ्यू शॉर्टला अक्षर पटेलने २५ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर ९ व्या षटकात अक्षरनेच जोश इंग्लिसलाही १२ धावांवर त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात शिवम दुबेने मिचेल मार्शचा अडथळा दूर केला. मार्शने २४ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. पण नंतर टीम डेव्हिड आणि जोश फिलिप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, टीम डेव्हिडला दुबेने १४ धावांवर, तर फिलिपला अर्शदीप सिंगने १० धावांवर बाद केले. पण तोपर्यंत ऑस्ट्रेलिया ९८ धावांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पुनरागमन करणारा ग्लेन मॅक्सवेलही फार काही करू शकला नाही. वरुण चक्रवर्तीने त्याला २ धावांवरच त्रिफळाचीत केले. तरी मार्कस स्टॉयनिसवर ऑस्ट्रेलियाच्या आशा होत्या. पण १७ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर पहिल्यांदाच गोलंदाजी करायला आला आणि त्याने सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला. त्याने या षटकात चौथ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसला १७ धावांवर पायचीत केले, तर पुढच्याच चेंडूवर झेव्हियर बार्टलेटला शून्यावर स्वत:च झेल घेत माघारी धाडले.

तत्पुर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६७ धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने २१ चेंडूच २८ धावा केल्या, तर शिवम दुबे २२ धावा, कर्णधार सूर्यकुमार यादव २० धावा आणि अक्षर पटेल नाबाद २१ धावा केल्या. पण भारताकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ऍडम झाम्पा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. झेव्हियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

शिवम दुबेचा गगनचुंबी षटकार

चौथ्या टी-२० सामन्यात, शिवम दुबेने एक गगनचुंबी षटकार मारला, ज्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवावा लागला. शिवम दुबेने अॅडम झाम्पाच्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार खेचला आणि चेंडू थेट मैदानाबाहेर गेल्याने नवा चेंडू आणावा लागला. अभिषेक शर्मा व शुबमन गिलची जोडी भारताकडून सलामीसाठी उतरली होती. पण खालच्या फलंदाजी फळीतील बदल सातत्याने सुरूच आहेत. चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला फलंदाजीला पाठवण्यात आलं. त्याने झटपट खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. शिवम दुबेने १८ चेंडूत १२२.२२ च्या स्ट्राईक रेटने २२ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment