फडणवीसांनी कोल्हापुरात सोडले उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच, महायुतीमधील तीन घटक पक्ष (भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी) एकत्र लढणार की नाही, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत याबद्दलची अंतिम भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण, कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकत्रच आहोत. कुठे युती झाली नाही तरी, 'पोस्ट पोल' (निवडणुकीनंतर) युती होईल," असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
म्हणजेच, काही ठिकाणी जागावाटपात एकमत न झाल्यास तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी, निवडणुकीच्या निकालानंतर ते एकत्र येतील, हे त्यांनी निश्चित केले. महाराष्ट्रातील जनता महायुतीलाच कौल देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते.
ठाकरेंवर जोरदार टीका
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार आणि खरवडून गेलेल्या जमिनीसाठी एकरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे. त्यांना टोमणे मारण्याशिवाय काहीही जमत नाही. त्यांनी विकासावर केलेले एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे मी आधीच म्हटलेलो आहे."






