Thursday, December 25, 2025

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव

अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने आपल्या जीवाची बाजी लावत चक्रीवादळात भरकटलेल्या दोन बोटींवरील १५ खलाशांना सुखरूपपणे करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला. त्यामुळे तो त्या १५ खलाशांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे.

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे रायगडमधील मच्छीमारीसाठी गेलेल्या अनेक बोटींचा संपर्क तुटला होता. यामध्ये करंजा येथील मच्छिंद्र नाखवा यांच्या मालकीच्या 'महागौरी' आणि 'नमो ज्ञानेश्वरी' या दोन मच्छीमारी बोटींचाही समावेश होता. या दोन्ही बोटींची वायरलेस आणि जीपीएस यंत्रणा बंद पडली होती. बोटींवर असलेले १५ खलाशी आणि तांडेल कुठे आहेत, याची कोणतीही माहिती मिळत नव्हती. बोट मालक मच्छिंद्र नाखवा यांनी कोस्टगार्डकडे तक्रार दाखल करण्यासह अनेक स्तरांवर शोध घेण्याचा प्रयत्न केला; या परिस्थितीत मच्छिंद्र नाखवा यांनी करंजा येथील युवक आतिश कोळी याला बोटींचा शोध घेण्यासाठी पाचारण केले. समुद्र खवळलेला असतानाही आतिश कोळी याने आपल्या जीवाची पर्वा न करता, करंजा येथून बचाव कार्यासाठी आपली बोट घेऊन प्रवास सुरू केला. बोटींचे जीपीएस बंद असल्याने आतिश आणि त्यांच्या साथीदारांनी मोबाइलच्या जीपीएसच्या मदतीने प्रवास केला. सुमारे आठ तासांनंतर ते लोकेशनच्या ठिकाणी पोहोचले, मात्र तिथे बोटी आढळल्या नाहीत. रात्रीच्या वेळी परतीचा विचार साथीदारांच्या मनात आला, पण अतिशने दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असता, दोन्ही बोटी जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर दिसून आल्या; परंतु, त्यांची स्थिती अत्यंत बिकट होती. यामुळे खलाशांनी दोन्ही बोटी वादळात एकमेकांना बांधून नांगरून ठेवल्या होत्या. राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि अन्य ९ असे एकूण १५ खलाशी चार दिवस कोणतेही अन्न न शिजवता केवळ बिस्किटे आणि पाण्यावर होते. अतिशला पाहताच, आपला जीव वाचविण्यासाठी देवदूत आल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते निश्चिंत झाले. अतिश आणि त्याच्या साथीदाराने या बंद पडलेल्या दोन्ही बोटींना दोरीच्या साहाय्याने आपल्या बोटीला बांधले आणि परतीचा खडतर प्रवास सुरू केला. वादळी समुद्रातून दोन बोटींना बांधून आणणे अत्यंत अवघड होते; परंतु या सर्व संकटांवर मात करीत २४ तासांचा प्रवास करून अतिश कोळीने दोन्ही बोटी आणि १५ खलाशांना सुखरूपपणे करंजा बंदरात आणले.

Comments
Add Comment