नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, इस्रायल-गाझा अशा युद्धांनी जगभरात तणाव असताना ५५ देशांच्या शक्तीशाली युद्धनौका आणि पाणबुड्या भारताच्या समुद्रात दाखल होणार आहेत. यात अमेरिका, रशियादेखील असणार आहे. जगाला भारताची ताकद दाखवण्याची वेळ आली असून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी केली जाणार आहे.
भारतीय नौदल फेब्रुवारी २०२६ मध्ये विशाखापट्टणम येथे तीन मोठे आंतरराष्ट्रीय सागरी कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करणार आहे. ‘मिलन २०२६’ हा बहुराष्ट्रीय नौदल युद्धसराव १९ ते २६ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सरावात ५५ देशांचे नौदल सहभाग घेणार आहेत. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी ‘हार्बर फेज’ नंतर, २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात पाणबुडीविरोधी, हवाई आणि अत्याधुनिक सागरी ऑपरेशन्सचा ‘सी फेज’ आयोजित केला जाईल.
अमेरिकेसोबतच रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांची नौदले आपली विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या भारताच्या दिशेने पाठविणार आहेत. भारताने या भव्यदिव्य आयोजनाची तयारी सुरु केल्याचे नौदलाचे उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितले. मिलन २०२६ या मुख्य सरावाव्यतिरिक्त, भारतीय नौदल आणखी दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे यजमानपद भूषवणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ताफ्याचे पुनरावलोकन केले जाईल. यात भारताची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. सागरी सहकार्य वाढवण्यासाठी २००८ मध्ये स्थापन झालेल्या या ‘आयओएनएस’ परिषदेत नौदल प्रमुख एकत्र येऊन चर्चा करतील. या वेळी भारत २०२५ ते २०२७ साठी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.






