 
                            प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अचानक 'राजकीय ब्रेक' घेतला आहे. प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने ते पुढील दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या अचानक घेतलेल्या या ब्रेकमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती दिल्याची राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती दिली की, त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळण्यावर निर्बंध घातले आहेत. नेमकं काय झालं आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. मात्र, या अनपेक्षित घडामोडीमुळे ते उद्याच्या (दि. १) महाविकास आघाडीच्या 'सत्याच्या मोर्चा'लाही उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, त्यांची दररोज सकाळी होणारी पत्रकार परिषदही आता होणार नाही.
राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, उपचार सुरू असून ते लवकरच बरे होतील आणि साधारण नवीन वर्षात पुन्हा भेटीस येतील. 'आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,' अशी भावनिक साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सन २०२० मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती आणि तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्य तपासणी करत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 'ब्रेक'चे राजकीय अर्थ
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः प्रतिष्ठेची मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप ठाकरे गटाच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा वेळी, भाजपच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मदतीची गरज असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंना एकत्र येण्याची साद घातली जात आहे.
 
'वाचाळवीर' राऊतांना गप्प बसवले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे काय होणार, असा मोठा प्रश्न उभा आहे. मनसेला मविआत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून होऊ शकतात. विशेष म्हणजे, याच संदर्भात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्याचे विधान केले होते. या वक्तव्यावरून मनसेमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मनसे नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे, राऊत यांनी 'मी असं काही बोललो नाही' असा मेसेज राज ठाकरे यांना पाठवल्याचेही बोलले जाते.
या सर्व राजकीय वादळानंतर, 'बडबड करून शिवसेनेची वाट लावणाऱ्या' आणि 'सकाळचा भोंगा' म्हणून परिचित असलेल्या संजय राऊत यांना गप्प बसवण्यासाठी, तसेच त्यांच्या 'वाचाळवीर'पणामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वितुष्ट येऊ नये म्हणून, त्यांना 'सक्तीची विश्रांती' देण्यात आल्याची चर्चा राजकीय गोटात दबक्या आवाजात सुरू आहे. प्रकृतीची कारणे देत, राऊतांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा हा निर्णय 'स्ट्रॅटेजिक' मानला जात आहे.

 
     
    




