Friday, October 31, 2025
Happy Diwali

अनेक अपयशांनंतर MPSC मध्ये सिन्नरचा रवींद्र भाबड राज्यात तिसरा

अनेक अपयशांनंतर MPSC मध्ये सिन्नरचा रवींद्र भाबड राज्यात तिसरा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेचा 2024 चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला. सोलापूरच्या विजय घोरपडे यांनी राज्यात प्रथम, हिमालय घोरपडेने द्वितीय, तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा रवींद्र भाबड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लहानशा गावातून सुरुवात करून, अनेक अपयशांवर मात करत त्यांनी हे यश मिळवले आहे.

लहान गावातून मोठं स्वप्न

रवींद्र भाबड यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर येथील मोडी गावात झाले , तर माध्यमिक शिक्षण भोजापूर खुरे हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण डी कॉलेजमध्ये घेतल्यानंतर त्यांनी कला शाखेतून स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी घरची आर्थिक अडचण असताना पार्ट टाइम काम, मित्रांची मदत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी वाटचाल केली. भाबड म्हणतात, “यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो.” हाच त्यांचा ८ शब्दांचा सक्सेस मंत्र ठरला.

दहा गुणांनी पोलीस भरती हुकली

“मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. 2014 मध्ये पोलीस भरतीत मी दहा गुणांनी अपयशी ठरलो. तेव्हा पोलिसात भरती होणं सोपं होतं, पण मी जाणीवपूर्वक एमपीएससीची कठीण वाट निवडली,” असं भाबड यांनी सांगितलं.

पुणे गाठलं

2015 मध्ये त्यांनी नाशिकमध्ये तयारी सुरू केली आणि नंतर पुण्यात स्थायिक झाले. “सर्व परीक्षांची तयारी करणं ही मोठी चूक ठरते. एका लक्ष्यावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा अनुभव ते शेअर करतात.

पहिल्या काही प्रयत्नांत अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी स्वतःचे विश्लेषण करून सुधारणा केल्याचं ते सांगतात “अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते.”

“माझी गरीब परिस्थितीच माझं बळ”

रवींद्र भाबड यांचं म्हणणं आहे, “गरिबी ही शाप नाही, ती शिक्षकासारखी असते वास्तव शिकवते.” तरुणांना संदेश देताना त्यांनी सांगितलं “सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींना मित्र बनवा.”

रवींद्र भाबड यांची कहाणी सांगते — परिस्थिती कितीही कठीण असो, जर दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर यश नक्कीच मिळतं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा