आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला असून आता उद्या दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. क्रिस वोक्सच्या एका चेंडूने त्याच्या पायावर प्रहार केला होता, ज्यामुळे त्याला सूज आणि रक्तस्त्राव झाला. मात्र आता पंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे भारतीय संघाचे एक मोठे चिंतेचे कारण दूर झाले आहे.
ऋषभ पंतचा कायमस्वरूपी जर्सी क्रमांक १७ आहे आणि तो बहुतांशवेळी हा क्रमांक वापरतो. परंतु दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या सामन्यात तो १८ क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानात उतरला, हा क्रमांक विराट कोहलीचा आहे. मात्र ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी सुद्धा विराटच्या निवृत्तीनंतर काही खेळाडूंनी १८ नंबरची जर्सी घातली आहे.त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “लायन्सविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मुकेशने १८ नंबरची जर्सी परिधान केली होती. परंतु ‘भारत अ’ संघासाठी जर्सी क्रमांक ठरलेले नसतात. या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर नावं लिहिलेली नसतात आणि ते आपल्या पसंतीनुसार कुठलाही क्रमांक निवडू शकतात. जर्सी क्रमांक अधिकृतरीत्या फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निश्चित केले जातात.”
यावरून स्पष्ट होते की ऋषभ पंतने १८ नंबरची जर्सी घातली असली तरी ती केवळ सराव किंवा प्रॅक्टिस सामन्यासाठीच होती. त्यामुळे त्याने आपला कायमस्वरूपी १७ नंबरचा जर्सी क्रमांक बदलला किंवा सोडला आहे, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून भारतात सुरू होणार आहे. या मालिकेतून ऋषभ पंतचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तो संघाचा उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळेल. इंग्लंड दौऱ्यात पंतने उत्कृष्ट फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
सध्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून, पहिल्या दिवसाखेरीस दक्षिण आफ्रिका अ संघाने ३७ षटकांत २ गडी गमावून १४८ धावा केल्या आहेत. भारताकडून अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
या दुखापतीमुळे पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नव्हते. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संघात संधी मिळाली होती. त्या मालिकेत भारताने विजय मिळवला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वांचे लक्ष पुन्हा ऋषभ पंतकडे असणार आहे, कारण तो बराच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.