देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक
मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र सरकारसोबत ऐतिहासिक करार झाला. तब्बल २ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹ १६,५०० कोटी) इतकी गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या महत्वपुर्ण करारामुळे महाराष्ट्रासाठी समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दार उघडले आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.
या ऐतिहासिक करारामागे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असून, त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सागरी विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींना नवीन दिशा मिळेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्य देशाच्या सागरी नकाशावर एक अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून उदयास येईल,असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.






