Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय

मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न मिळवत नाही तोपर्यंत बेस्ट उपक्रमासमोरील आर्थिक समस्या कमी होणार नाही आणि नव्या बेस्ट महाव्यस्थापकानी असा प्रयत्न केल्यास राज्य सरकार त्याला संपूर्ण पाठिंबा देईल' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बेस्टच्या कुलाबा आगारातील नव्या १५७ वातानुकूलित विद्युत बसचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी, बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले असून राज्य सरकारच्या ५ हजार नवीन बस आणण्याच्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमातील १५७ नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या देणे आणि प्रदूषण कमी करणे हे या मागील मुख्य उद्दिष्ट आहे. "बेस्टची सेवा एकप्रकारे जीवनवाहिनी आहे," असेही ते म्हणाले. यावेळी ओशिवरा येथील बसचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्ग्या धावत होत्या, आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व बसेस पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. हे केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचे हरित वळण आहे.” पूर्वीच्या सरकारच्या काळात बेस्ट सेवा डबघाईला आली होती, पण महायुती सरकार आल्यावर बेस्टला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.

आधीच्या सरकारने बेस्टला वेस्ट केले, मात्र आम्ही ३ हजार ४०० कोटी रुपये निधी दिला असून यंदा आणखी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही फक्त सुरुवात असून, लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. ‘मुंबई वन ॲप’मुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन, एकाच तिकिटावर विविध सेवा, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होतील.” “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच नफ्याची नसते, पण ती जनतेच्या सोयीसाठी उत्कृष्ट आणि सुरक्षित बनवणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिके इतकाच दिवाळी बोनस देण्यात आला आहे.”

Comments
Add Comment