मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं चुटकीसरशी पूर्ण करण्यास मदत करत आहेत. एखादं कंटेंट तयार करणं, नवीन काही गोष्टी शिकवणं किंवा शिकणं असो किंवा एखादा फोटो वा व्हिडीओ तयार करणं असो सगळी काम AI मुळे शक्य झाली आहेत. या AI मुळे येत्या काळात माणसांच्या नोकऱ्यांवरही गदा येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात. पण AI चा जितका फायदा आहे तितका धोका सुद्धा आहे. आणि त्याचमुळे येत्या दीड वर्षात परंपरागत सिनेमा बंद होणार असल्याचं मतं निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्ष मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्येही महेश मांजरेकर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. विविध विषयांवरचे चित्रपट ते प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.
अश्यातच एका मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या दीड वर्षात चित्रपट बंद होणार असल्याचं भाकीत केलं आहे. महेश मांजरेकर म्हणाले "माझं मत आहे की दिी वर्षात सिनेमा हा प्रकार बंद होईल. बंद म्हणजे बंदच . AI आता सगळ्यावर भारी पडत आहे. AI ने बनवलेले सिनेमाचे ट्रेलर जर तुम्ही पाहिलेत तर त्यातील व्हिज्युअल्स दाखवणं शक्यच नाही. मी या AI सोबत आज घर बसल्या टायटॅनिक सिनेमामधील लायटिंग, एखादा चांगला हिरो आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम असा सिनेमा करू शकतो". त्यांनतर ते म्हणाले " मी महाभारताचा ट्रेलर पाहिला. अक्षरश: डोळे दिपवणारा ट्रेलर आहे. जर हे सगळं एका क्लिकवर होणार असेल तर लोक कलाकारांसाठी का पैसे खर्च करतील?. अर्थात AI वापण्यासाठीसुद्धा हुशारी लागतेच. मी सहा महिन्यापूर्वी पाहिलेला AI आणि आताचा AI यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. ज्या दिवशी त्यांच्या AI हाती सिनेमा बनण्याचा कोड लागेल. त्या दिवशी आपण संपणार, रोज १० हजार सिनेमे बनतील आणि याला खर्चही येत नाही. माझ्या एका मित्राने AI च्या मदतीने ऍड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त २ हजार रुपये. त्यामुळे लोक AI वर सिनेमे बनवणार हे माझं भाकीत आहे."






