Saturday, October 25, 2025
Happy Diwali

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य युद्धाभ्यास करणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार भारताचे भूदल, नौदल आणि हवाई दल ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युद्धाभ्यास करणार आहे. गुजरात आणि राजस्थानमधून जाणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य युद्धाभ्यास करणार आहे. यासाठी नोटॅम जारी झाला आहे. या नोटॅमनुसार ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत गुजरात आणि राजस्थानमधून जाणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेलगत आकाशात दहा हजार फुटांपासून २८ हजार फुटांपर्यंतची भारताची हवाई हद्द (एअरस्पेस) ही सुरक्षेच्या कारणास्तव बंद असेल. बंद असलेल्या हवाई हद्दीतून कोणत्याही प्रकारची नागरी विमान वाहतूक होणार नाही.

गुजरातमधील सर क्रीक खाडीपासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत मोठ्या क्षेत्रात युद्धाभ्यास होणार आहे. या युद्धाभ्यासत भूदल, नौदल आणि हवाई दल अनेक अत्याधुनिक युद्धतंत्राचा सराव करणार आहेत. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अत्याधुनिक युद्धाभ्यास असेल. यात इंटेलिजन्स सर्व्हेलन्स, इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर कपॅलिटीज तपासल्या जातील. युद्धाभ्यासात अनेक लढाऊ विमानं, ड्रोन क्षेपणास्त्र यांचाही वापर होणार आहे. युद्ध काळातील भूदल, नौदल आणि हवाई दल यांचा परस्पर समन्वय तपासला जाईल. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यास करणार आहे. भारताच्या या युद्धाभ्यासाला त्रिशूल असे नाव देण्यात आले आहे.

या युद्धाभ्यासाचे नियोजन सुरू असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमध्ये जैसलमेर येथे जाऊन सैनिकांची भेट घेतली. लोंगेवाला येथे तैनात असलेल्या भारताच्या जवानांची आपुलीने विचारपूस केली. सैनिकांसोबत जेवण केले. काही दशकांपूर्वी १९६५ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यानच्या संघर्षात याच लोंगेवाला पोस्टवरील भारताच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. रात्रभर पाकिस्तानच्या सैन्याला रोखून धरले होते. पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानचे अनेक रणगाडे तसेच लष्करी वाहने नष्ट केली. यामुळे लढाईत भारताची बाजू एकदम भक्कम झाली होती. यामुळेच संरक्षणमंत्र्यांच्या राजस्थानमधील दौरा महत्त्वाचा होता. या दौऱ्यात संरक्षणमंत्र्यांसोबत भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्व‍िवेदी आणि बॅटल एक्स कमांडर मेजर जनरल आशीष खुराणा सहभागी झाले होते.

भारताच्या सीमेचे ६५ च्या युद्धात सैनिकांनी रक्षण केले. या सैनिकांच्या पाठिशी तनोट राय मातेचे आशीर्वाद होते असे स्थानिक आजही सांगतात. पाकिस्तानने हल्ला सुरू केला त्यावेळी अनेक तोफगोळे डागले, बॉम्ब टाकले. पण तनोट राय मातेच्या मंदिराचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही. देवी सैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभी होती असेही स्थानिक सांगतात. या श्रद्धेचा आदर करत संरक्षणमंत्र्यांनी राजस्थान दौऱ्यात तनोट राय मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जेव्हा माध्यमांसमोर हा देवीच्या दर्शनाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी सैनिक युद्धभ्यासाच्या नियोजनात गुंतले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >