मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी ४ नोव्हेंबर पर्यंत https://forms.gle/Kmof5utKSuEqL3Pb9 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रा. मार्क धरमाई यांनी केले आहे.
राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५-२६ मधील राष्ट्रीय युवा महोत्सव (Viksit Bharat Challenge Track) चे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या दरम्यान होणार असून त्यासाठीची जिल्हास्तरीय निवड म्हणून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी अनिल घुगे (स्पर्धा प्रमुख) जिल्हा युवा महोत्सव यांना संपर्क साधावा.