
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अॅडलेडचा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २ - ० अशी खिशात टाकली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनीत होणार आहे. पण मालिकेचा निर्णय आधीच लागल्यामुळे सिडनीतील सामना हा निव्वळ औपचारिकतेपुरता उरला आहे. हा सामना जिंकून भारत व्हाईटवॉश टाळतो का ? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये झालेला पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमाने जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने अॅडलेडचा एकदिवसीय सामना दोन गडी राखून जिंकला.
पर्थ पाठोपाठ अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ऑस्ट्रेलियाला फायद्याचे ठरले. अॅडलेड येथील सामन्यात भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे ५० षटकांत २६५ धावा करण्याचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाने ४६.२ षटकांत आठ बाद २६५ धावा करुन सामना जिंकला.
अॅडलेडच्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ११, टी. हेडने २८, मॅथ्यू शॉर्टने ७४, मॅट रेनशॉने ३०, अॅलेक्स कॅरीने ९, कूपर कॉनोली नाबाद ६१, मिचेल ओवेनने ३६, झेवियर बार्टलेटने ३, मिचेल स्टार्कने ४, झम्पाने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ बळी घेतला. याआधी भारताकडून रोहित शर्माने ७३, शुभमन गिलने ९, विराट कोहलीने शून्य, श्रेयस अय्यरने ६१, अक्षर पटेलने ४४, केएल राहुलने ११, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद २४, अर्शदीपने १३, मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने ४, बार्टलेटने ३ आणि स्टार्कने २ बळी घेतले.