Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला

महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला

ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी मुंबईत 'एकत्र'

राज्यात इतरत्र 'स्वतंत्र' लढून निकालानंतर युती

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीचे (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) संपूर्ण लक्ष आता देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर (BMC) केंद्रित झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे (ठाकरे गट) वर्चस्व मोडून सत्ता मिळवण्याचा भाजपने चंग बांधला असून, याच पार्श्वभूमीवर महायुतीने निवडणुकीसाठी एक मोठा 'फॉर्म्युला' निश्चित केला आहे.

मुंबईत एकत्र, इतरत्र 'स्वबळ'

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची रणनिती ठरली आहे.

त्यानुसार, मुंबई महानगरपालिका आणि काही मोजक्या ठिकाणी महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र युती करून निवडणूक लढवणार.

अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्र (स्वबळावर) निवडणूक लढतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उर्वरित ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी रणनीती महायुतीने आखली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना यावर भाष्य केले आणि मुंबईत महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले.

फॉर्म्युला का ठरला?

मुंबईत एकत्र लढण्यामागे एक मोठे कारण आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही युतीची तयारी दर्शवली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी महायुतीने मुंबईत ताकद एकवटण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी, त्यांचे लक्ष्य महाविकास आघाडीला (मविआ) दूर ठेवणे हेच आहे. जर महायुतीचे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर त्यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआला होऊ शकतो. हे टाळण्यासाठी 'निकालानंतर एकत्र' येण्याची महत्त्वपूर्ण रणनीती आखण्यात आली आहे.

ठाणे मनपाची परिस्थिती काय?

ठाणे महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. २०१७ मध्ये भाजप आणि शिवसेना (तत्कालीन) स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शिवसेनेला ६७ आणि भाजपला फक्त २३ नगरसेवक मिळाले होते. आता ठाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. सध्या ८५ माजी नगरसेवक शिंदे गटाकडे आहेत, तर भाजपकडे २३ माजी नगरसेवक आहेत. ठाण्यात शिंदे गट आणि भाजपने वेगवेगळे लढल्यास स्थानिक स्तरावर मोठा संघर्ष निर्माण होऊन मतांचे विभाजन होऊ शकते. याउलट मविआ एकत्र लढल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक हे शिंदे गटाची कोंडी करताना दिसत असल्याने, ठाण्यात दोन्ही पक्षांनी एकत्र लढणे महायुतीसाठी महत्त्वाचे ठरू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >