
नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांच्यात या ट्रॉफीच्या हस्तांतरावरून तणाव निर्माण झाला आहे. ट्रॉफी भारताला देण्यास ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांनी नकार दिला असून, त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये मतभेद वाढले आहेत.
BCCIने नुकताच ACCला एक अधिकृत मेल करून, आशिया कपची विजेतेपद ट्रॉफी भारताला पाठवण्याची विनंती केली होती. मात्र ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांनी त्याला प्रत्युत्तर देताना, "कोणताही भारतीय प्रतिनिधी दुबईतील ACC मुख्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जावा," अशी अट घातली. ही अट BCCIने फेटाळली असून त्यांनी ट्रॉफी भारतातच पाठवण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
बीसीसीआयचा आक्रमक पवित्रा
BCCIने नक्वींकडून थेट ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बोर्डाचे पदाधिकारी या मुद्यावर ICCच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा करणार आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, विजेता संघ असूनही ट्रॉफी न मिळणे हे अपमानास्पद आहे आणि ACCचे वर्तन अनावश्यक राजकीय हस्तक्षेपासारखे वाटत आहे.
२८ सप्टेंबर रोजी भारताने आशिया कप फायनल जिंकला होता. मात्र मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन परत गेले आणि ती अजूनही ACCच्या मुख्यालयात आहे. या घटनेनंतर वाद अधिकच चिघळला.
मोहसिन नक्वी यांनी आशिया कप दरम्यान आपल्या सोशल मीडिया हँडलवर भारताच्या सैन्य कारवाईविरोधात टीका करणारे व्हिडिओ आणि मीम्स पोस्ट केले होते. यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. ACCच्या नंतरच्या बैठकीतही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. ACCच्या कर्मचाऱ्यांना नक्वी यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही ट्रॉफी भारताला देऊ नये.
सध्या ICCचे अध्यक्ष जय शाह हे बीसीसीआयचे माजी सचिव आहेत. त्यामुळे ICCच्या पुढील बैठकीत या प्रकरणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. BCCI आणि ACCमधील हा वाद केवळ क्रीडा क्षेत्रापुरता न राहता राजकीय रंग घेऊ लागला आहे.
आशिया कप 2025 ची ट्रॉफी विजेता भारताच्या घरी जाण्याऐवजी अजूनही ACC मुख्यालयात अडकून पडली आहे. ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांची अट आणि बीसीसीआयचा नकार यामुळे वाद वाढत चालला आहे. ICC या प्रकरणात काय भूमिका घेते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.