मुंबई : हिंदी सिनेमाच्या जगतात आपल्या खास विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४व्या वर्षी मुंबईत निधन झाले. जयपूरमध्ये १ जानेवारी १९४१ रोजी जन्मलेले असरानी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९६०च्या दशकात केली. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून त्यांचे कॉमिक टायमिंग आणि अभिनयशैली अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 'शोले' चित्रपटातील त्यांची 'जेलर' ही भूमिका आजही एक विनोदी आयकॉन मानली जाते. 'खट्टा मीठा', 'चुपके चुपके', 'भूल भुलैया', 'धमाल', 'वेलकम' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने हास्याचे क्षण दिले.
असरानी यांचे शिक्षण जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये झाले. त्यांनी राजस्थान कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर काही काळ रेडिओ कलाकार म्हणूनही काम केले. त्यानंतर अभिनयात रस वाढल्याने त्यांनी मुंबई गाठली. तिथे किशोर साहू आणि हृषिकेश मुखर्जी यांच्याशी झालेल्या भेटींमुळे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली.
'गुड्डी' या जया भादुरी अभिनीत चित्रपटातून असरानी यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची खरी सुरुवात केली. हा चित्रपट यशस्वी ठरला, आणि असरानी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. मात्र, सुरुवातीला त्यांना व्यावसायिक अभिनेता म्हणून स्वीकारले जात नव्हते, हे त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते. गुलजार यांच्यासारखे दिग्दर्शक देखील त्यांचा चेहरा 'चमत्कारिक' असल्याचे म्हणत होते. पण एकदा अभिनयात आपली जागा मिळाल्यावर असरानी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
त्यांनी अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केले असून १९७२ ते १९८४ दरम्यान मुख्य भूमिकांमध्ये आणि नंतर २०१२ पर्यंत सहायक भूमिकांमध्ये झळकले. त्यांनी अभिनेत्री मंजू बंसल इराणी यांच्याशी विवाह केला होता, ज्यांच्यासोबत त्यांनी 'आज की ताजा खबर' आणि 'नमक हराम' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
असरानी यांच्या निधनाने बॉलिवूडने एक हसतमुख, हसरा चेहरा गमावला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा शेअर केल्या होत्या, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या जाण्याचा धक्का बसला आहे.