
राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या शेजारील देशांशी लागून असलेल्या ३० किलोमीटर सीमा भागातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली असून, राजस्थानसह इतर राज्यांमध्येही यासाठी तयारी केली जात आहे.
ही मोहीम सीमावर्ती भागांतील लोकसंख्येतील बदल रोखण्याच्या आणि घुसखोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गृह मंत्रालयाच्या अलीकडील सीमा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर विभागाचे संचालक आणि विविध राज्यांचे मुख्य सचिव यांना स्पष्ट निर्देश दिले की, सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सुनिश्चित करतील की सीमेपासून ३० किमी अंतराच्या आत कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि असल्यास तत्काळ हटवण्यात यावे.
प्रमुख राज्यांतील कारवाईचे तपशील
गुजरात : समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये कारवाई सुरू असून, पिरोटन बेटावर ४ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेश : नेपाळ सीमेला लागून असलेल्या लखीमपूर खिरी, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, महाराजगंज, बहराइच, बलरामपूर आणि पीलीभीत या जिल्ह्यांमध्ये २९८ अनधिकृत धार्मिक स्थळे ओळखण्यात आली असून त्यातील अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही लवकरच ही मोहीम राबवली जाणार आहे.