
नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने निघालेल्या तीन युवकांना नियतीने अर्ध्या रस्त्यातच गाठले. मुंबई-रक्सौल कर्मभूमी एक्सप्रेसमधून धावत्या गाडीतून खाली पडून तीन तरुण अपघाताला बळी पडले, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दिवाळीच्या गर्दीमुळे दुर्घटना
सध्या दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेत प्रचंड गर्दी उसळली आहे. या गर्दीमुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवार रात्रीच्या सुमारास नाशिक रोड स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये तिघे तरुण दरवाजेजवळ उभे होते. नाशिक रोड स्थानकातून गाडी पुढे गेल्यानंतर जेल रोड परिसरातील ढिकले नगरजवळ त्यांचा तोल गेला आणि ते तिघेही धावत्या रेल्वेतून खाली फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या अपघातात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले, तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जखमी युवकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत आणि जखमी व्यक्तींकडे कोणतीही ओळखपत्रे नसल्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सणासाठी निघालेले हे तरुण नेमके कोण आणि कुठले, याचा तपास सुरू आहे. मात्र, ऐन सणाच्या काळात ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात करणारी ठरली आहे.
रेल्वे लोको पायलटने दिली माहिती
इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी तातडीने नाशिकरोड रेल्वे स्थानक कार्यालयात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.