विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर


प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री. मंत्री यांचा जन्म ६ जानेवारी १९२५ रोजी कोकणातील कुऱ्हाडजवळच्या झाराप या गावी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे मूळ नाव रमेश शंकर कुळकर; परंतु मंत्री घराण्यात दत्तक गेल्यामुळे रमेश राजाराम मंत्री असे त्यांचे नामांतर झाले. त्यांचे संपूर्ण शिक्षण कोल्हापूर येथे झाले. एम. ए. चा अभ्यासक्रम सुरू असतानाच स्थानिक वृत्तपत्रांतून ते लिखाण करू लागले. त्यानंतर ‘पुढारी’ या दैनिकात त्यांनी सहसंपादक म्हणून काही दिवस काम केले. वृत्तपत्रव्यवसायाचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. १९५८ ते ७८ या काळात ते अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साहजिकच जगभर त्यांनी भरपूर प्रवास केला. या प्रवासातून विविध प्रकारचे अनुभव घेत घेत लेखनासाठी आवश्यक असलेली एक समृद्ध पार्श्वभूमी त्यांच्याजवळ निर्माण झाली आणि त्यातूनच मुळातच प्रतिभासंपन्न साहित्य निर्मिती केली.


मा. रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘थंडीचे दिवस’, सुखाचे दिवस, ‘नवरंग’ इत्यादी त्यांची प्रवासवर्णने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरली आणि वाचकांच्या पसंतीत उतरली. त्यांनी प्रचंड लेखन केले. १९७९ या एकाच वर्षात त्यांची ३४ पुस्तके प्रकाशित झाली. इतक्या संख्येने पुस्तके प्रकाशित होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रवासवर्णन जशी मंत्री यांनी लिहिली तसेच साहित्याचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. त्यापैकी करमणूक प्रधान असे विनोदी लेखन त्यांनी बरेच केले.


त्यांचा जन्म कोकणात, कुडाळ-जवळच्या झाराप या गावी झाला. १९५८ साली अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी या नात्याने ते वास्तव्यासाठी अमेरिकेत गेले. १९७८ सालापर्यंत ते तिथे होते. त्या काळात देश-विदेशांत त्यांचा भरपूर प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभवांवर त्यांनी प्रवासवर्णने लिहिली. त्यांच्या लेखनाचा झपाटा वाखाणण्याजोगा होता. रमेश मंत्री


(६ जानेवारी १९२५-१९ जून १९९८) यांनी वृत्तपत्रातील उमेदवारीपासून सुरुवात केली आणि ख्यातनाम विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून ते पुढे मान्यता पावले. खुसखुशीतपणा हा त्यांच्या लेखनाचा सर्वव्यापी विशेष होता. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग, कोल्हापुरी चिवडा, हसण्याचा तास पहिला, हास्यधारा, अति झाले अन् हसू आले अशी शंभरांहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. १९९२ साली कोल्हापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मंत्रींनी इंदिरा संत यांचा पराभव केला होता. साधारणतः निवडून आलेल्या अध्यक्षांवर वृत्तपत्रे अग्रलेख लिहितात; परंतु संतांचा पराभव झाल्याने महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हाचे संपादक गोविंदराव तळवलकर एवढे संतापले होते की, त्यांनी पराभूत उमेदवार इंदिरा संत यांच्या गुणगौरवाचा अग्रलेख लिहिला होता.


रमेश मंत्री यांच्या नावावर १३०हून अधिक पुस्तके आहेत. त्यांतली बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. ‘थंडीचे दिवस’, ‘सुखाचे दिवस’, ‘नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. प्रांजळ, प्रसन्न, दिलखुलास लेखणीतून उतरलेली त्यांची प्रवासवर्णने वाचकांना त्या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतात. ‘आंध्र’, ‘ओरिसा’, ‘एलिझाबेथ टेलर आणि मी’, ‘ओ कलकत्ता’, ‘करीन ती पश्चिम’, ‘दिशांतर’, ‘गांधीजींचा गुजरात’, ‘चार मीनार’, ‘जपानी आटापिटा’, ‘सूर्यपुत्रांचा देश’, ‘बारा लाखांत जगाची सफर’, ‘बंगलोर ते बदामी’, ‘संगमरवरी प्रदेश’, ‘सोमनाथ ते साबरमती’ यांसारखी अनेक प्रवासवर्णने त्यांनी लिहिली.


विनोदी फॅण्टसी हा सर्वस्वी नवा साहित्यप्रकार त्यांनी मराठी वाङ्मयात रूढ केला. त्यातूनच जेम्स बॉण्डच्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली. ‘सह्याद्रीची चोरी’, ‘सचिवालयात हत्ती’, ‘अति झालं नि हसू आलं’, ‘ओठ सलामत तो’, ‘एका हाती टाळी’, ‘झाली काय गंमत’, ‘हसण्याचा तास तिसरा’, ‘थट्टा मस्करी’, ‘चोरांचा सौजन्य सप्ताह’ यांसारखी आणखीही ‘विनोद’ या प्रकारात मोडणारी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘मुलखावेगळी माणसं’, ‘अशी असतात एकेक माणसं’, ‘तुमच्या पायी ठेविले मन’ ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आणि ‘साप्ताहिकी’, ‘चटक चांदणी’, ‘कुंकू’, ‘उत्तरकाल’, ‘उत्तरकांड’, ‘गुजगोष्टी’, ‘चंदेरी’, ‘आटापिटा’ यांसारखी नाट्य, कथा, कादंबरी प्रकारांतील साहित्यनिर्मितीही त्यांनी केली.


मात्र लेखन करताना समीक्षक काय म्हणतील याची फिकीर करण्याऐवजी हलक्या-फुलक्या मजकुराला मनापासून दाद देणारा सामान्य रसिक वाचक डोळ्यांसमोर ठेवूनच ते लिहीत गेले. आपल्या लेखनाशी ते इतके प्रामाणिक होते, की दररोज सकाळी ३-४ तास, सर्व शक्ती एकवटून ते लिहायला बसतच. त्यांचे सर्व लेखन एकटाकी असे.


मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ हा अतिशय अभिनव कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. १९९२ सालच्या कोल्हापूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते.


इंग्लंडमध्ये असताना अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग व अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांना प्रत्यक्ष भेटण्याची मिळालेली संधी ही त्यांच्यासाठी अतिव समाधानाची बाब होती. आपले एक तरी पुस्तक रशियाचे अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांना अर्पण करण्याची आणि कर्मयोगी बाबा आमटे यांचे चरित्र लिहिण्याची, अशी त्यांची दोन स्वप्ने जागीच विरली. मूर्तिमंत उत्साह, उत्सवप्रियता हा स्वभाव; सहजता, मौलिक, तल्लख विनोदबुद्धी, त्यातून आलेला हजरजबाबीपणा, कोणत्याही गोष्टीतले मर्म चटकन पकडण्याचे कौशल्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.


अंतर्गत कठोर शिस्तीचे पालन करणाऱ्या रमेश मंत्री यांच्या डोक्यात काळ-काम-वेग यांचे गणित पक्के बसलेले होते. असे सतत कार्यमग्न असणारे चैतन्यमूर्ती रमेश मंत्री हे आयुष्यात कृतकृत्य होते; पण अखेरीस अर्धांगवायूमुळे उजवी बाजू अचेतन झाल्याने त्यांच्या भ्रमंतीला आणि गप्पाटप्पांना खीळ बसली हा दैवदुर्विलास होय.

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले

जमीन मालकाची फसवणूक

क्राइम : अॅड. रिया करंजकर उद्योगधंदे व कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणाई शहराकडे ओढली जात आहे आणि