
बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी साधारण महिन्याभरापूर्वी टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवले. पूजा हिने केलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यामुळेच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला त्वरित ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरुंगाच्या गजाआड असलेल्या पूजाची यंदाची दिवाळी देखील तुरुंगातच जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने पूजा गायकवाडचा जामीन अर्ज (Bail Application) फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे, तसेच या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत अजून वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. संसदेपासून ...
नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे हे पत्नी, मुले आणि कुटुंबीयांसह राहत असले तरी, वर्ष-दीड वर्षापूर्वी ते कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडले होते. कलाकेंद्रात झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. मात्र, पूजासाठी गोविंद बर्गे हे फक्त एक 'कस्टमर' होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं-नाणं आणि मालमत्ता उकळता येईल. वर्षभरात गोविंद बर्गे यांनी पूजाला महागडे मोबाईल, दागिने, रोख पैसे आणि मालमत्ता अशी बक्कळ रक्कम खर्च करून दिली. एवढे देऊनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. पूजा हिने तो बंगला स्वतःच्या नावावर करण्याची मागणी केली, तसेच भावाच्या नावावर जमीन करून देण्याचा तगादा लावला. बर्गे यांनी या मागण्या फेटाळताच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. पूजा हळूहळू बर्गे यांच्याशी बोलणे टाळू लागली आणि फोन उचलणे बंद केले. यावरही गोविंद बधत नसल्याचे पाहून तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पूजाने गोविंद बर्गे यांना 'खोट्या गुन्ह्यात अडकवेन', 'अत्याचार केल्याचा आरोप करेन' अशा धमक्या दिल्या. ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले, तिचे हे रूप पाहून गोविंद बर्गे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण पूजाने काहीही ऐकले नाही. अखेरीस, या मानसिक त्रासाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी टोकाचे पाऊल उचलले.
'जर ती बोलली असती तर'...
बीड येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील अखेरच्या क्षणांचा तपशील अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्या रात्री गोविंद बर्गे यांचा मृत्यू झाला, त्यापूर्वी संध्याकाळी ते नर्तिका पूजा गायकवाड हिला भेटण्यासाठी तिच्या सासुरवाडीला गेले होते. गोविंद बर्गे जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा पूजा गायकवाड घरी नव्हती आणि ती फोनही उचलत नव्हती. तिच्या आईनेही गोविंद यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक तणावात असलेल्या गोविंद बर्गे यांनी अखेर पूजाला व्हिडिओ कॉल करून आत्महत्येचा स्पष्ट इशारा दिला. दुर्दैवाने, समोरून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहून गोविंद बर्गे यांचा संताप आणि नैराश्य वाढले. ते रागातच आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात अशी जोरदार चर्चा सुरू आहे की, गोविंद बर्गे यांनी कॉल केल्यावर पूजाने त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधला असता, तर कदाचित त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले नसते आणि त्यांचा जीव वाचला असता. दुर्देवाने, त्यांच्या या शेवटच्या प्रयत्नाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे एका व्यक्तीचा जीव गेला.
दिवाळीतही पूजा गायकवाडला 'नो बेल'
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले होते. तिच्यामुळेच गोविंद यांचा जीव गेला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. तिला सुरुवातीला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर, न्यायालयाने तिची रवानगी तुरुंगात केली. सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद: पूजा गायकवाडने पुन्हा जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला होता. मात्र, तिला जामीन मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत बाजू मांडली. वकिलांनी नमूद केले, "जर आरोपी पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला, तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल. अशा महिलांकडून पुरुषांची आर्थिक आणि मानसिक छळवणूक होण्याची शक्यता आणखी वाढेल." जामीन फेटाळला, मुक्काम वाढला: न्यायालयाने डॉ. राजपूत यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत, पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, यंदाची दिवाळीही तिला गजाआडच काढावी लागणार आहे.