
रायपूर : छत्तीसगडच्या उत्तर बस्तरमधील अबुझमाडमध्ये शुक्रवारी २१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यात ११० महिला आणि ९८ पुरुषांचा समावेश आहे. त्यांनी १५३ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण करणे हे नक्षलविरोधी मोहिमेसाठी एक मोठे यश आहे.
या संदर्भात एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अबुझमाडचा बहुतांश भाग नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून मुक्त झाला आहे, ज्यामुळे उत्तर बस्तरमधील दशकांपासून सुरू असलेली दहशत संपली आहे. याचा अर्थ असा की नक्षलवाद आता फक्त दक्षिण बस्तरमध्ये अस्तित्वात आहे. बस्तर प्रदेशात कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, बस्तर, दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्हे समाविष्ट आहेत. छत्तीसगडमधील नारायणपूर, विजापूर, दंतेवाडा आणि कांकेर जिल्हे आणि महाराष्ट्रातील गडचिरोली यांच्या सीमेवर असलेला अबुझमाड प्रदेश एकेकाळी वरिष्ठ नक्षलवादी कार्यकर्त्यांसाठी लपण्याचे ठिकाण आणि गनिमी प्रशिक्षण तळ मानला जात असे.
आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी (माओवादी)च्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करतात. यामध्ये एक केंद्रीय समिती सदस्य, ४ दंडकारण्य विशेष प्रादेशिक समिती सदस्य, एक प्रादेशिक समिती सदस्य, २१ विभागीय समिती सदस्य, ६१ क्षेत्र समिती सदस्य, ९८ पक्ष सदस्य, २२ पीएलजीए/आरपीसी कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
नक्षलविरोधी कारवाईदरम्यान, माओवाद्यांनी १५३ शस्त्रे पोलिसांना सोपवली. यामध्ये १९ एके- ४७ रायफल्स, १७ एसएलआर रायफल्स, २३ आयएनएसएएस रायफल्स, एक आयएनएसएएस एलएमजी, ३५ थ्री-नॉट-थ्री रायफल्स, ४१ बारा-बोर किंवा सिंगल-शॉट गन आणि यांचा समावेश आहे.
“एकेकाळी दहशतवादाचा गड असलेले छत्तीसगडचे अबुझमाड आणि उत्तर बस्तर आज नक्षलवादी हिंसाचारमुक्त घोषित झाले ही खूप आनंदाची बाब आहे. दक्षिण बस्तरमध्ये फक्त काही नक्षलवादी उरले आहेत, ज्यांना आमचे सुरक्षा दल लवकरच संपवतील. ते म्हणाले की, जानेवारी २०२४ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यापासून २,१०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, १,७८५ जणांना अटक करण्यात आली आहे आणि ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा आमचा निर्धार दर्शवतात, असे अमित शहा म्हणाले.