
पुढील काही महिन्यांत 'वंदे भारत ४.०' धावणार!
नवी दिल्ली : प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishanav) यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये वंदे भारत ४.० (Vande Bharat 4.0) ही नवीन आवृत्तीची रेल्वे सेवा सुरू होणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही वंदे भारत ४.० रेल्वे आधीच्या ३.० आवृत्तीपेक्षा अधिक जलद गतीने धावणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी ती जास्त आरामदायी आणि आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. या घोषणेनंतर भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे. वंदे भारत ४.० च्या आगमनाने रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि वेगवान होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच शाहिद कपूर हा सध्या त्याच्या कॉकटेल २ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये असला व्यस्त असला तरी चर्चा होते ती ...
आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रदर्शनात 'वंदे भारत ४.०' ची घोषणा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ४.० ची महत्त्वपूर्ण घोषणा दिल्लीतील भारत मंडपम येथे केली. ते १६ व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन तीन दिवसांचे असून, ते आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात १५ हून अधिक देशांमधील ४०० हून अधिक कंपन्या त्यांची अत्याधुनिक रेल्वे उत्पादने प्रदर्शित करत आहेत. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड्स, रशिया, स्वित्झर्लंड, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स (अमेरिका) यांसारख्या प्रमुख देशांमधील कंपन्यांचा समावेश आहे. जगातील एवढ्या मोठ्या मंचावरून वंदे भारत ४.० ची घोषणा झाल्यामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता ५२ सेकंदांपेक्षा कमी वेळेत १०० किमी वेग, 'मेक इन इंडिया' रेल्वेची जगात धाव
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, नवी वंदे भारत ४.० ही सर्वात वेगवान असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनी वंदे भारतच्या तांत्रिक प्रगतीबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्याची वंदे भारत ३.० ही रेल्वे ५२ सेकंदांमध्ये शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास (0 ते 100 kmph) वेग वाढवते. हा वेग जपान आणि युरोपमधील काही हाय-स्पीड गाड्यांपेक्षाही अधिक आहे. वंदे भारत ४.० मध्ये ही क्षमता अजून जास्त असेल. सुधारित मोटर तंत्रज्ञान (Motor Technology) आणि हलक्या डिझाईनमुळे (Lighter Design) ही ट्रेन आणखी कमी वेळेत जास्त वेग गाठू शकेल. ही ट्रेन अधिक वेगवान असण्यासोबतच, त्यातील आसनांची सेवा (Seating Services) वाढवण्यात आली आहे आणि कोचची कामगिरी (Coach Performance) इतर ट्रेनपेक्षा अधिक सुधारित केली गेली आहे. आराम, सुरक्षितता आणि डिझाईनमध्येही लक्षणीय सुधारणा असतील. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी भारतीय रेल्वेच्या भविष्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचीही माहिती दिली. भारतीय रेल्वे २०४७ सालापर्यंत ७,००० किलोमीटर लांबीचे कॉरिडॉर विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या भविष्यातील कॉरिडॉरवरील गाड्या ताशी ३५० किमी वेगाने धावू शकणार आहेत.