Friday, October 17, 2025
Happy Diwali

सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी बृहद् आराखडा

सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी बृहद् आराखडा

तीन जिल्ह्यांच्या ऐतिहासिक प्रसिद्धीसाठी ‘डीएमओ’ निर्माण करणार

मुंबई : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहद् आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिल्या आहेत. त्या बृहत् आराखड्यामध्ये त्याचे जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे याचा समावेश असणार आहे.

मैत्रीच्या सोबतीने पुरातत्व विभाग ज्या मध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करेल, अशा पद्धतीचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. शिवाय पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक तीन जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत् आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील मंदिरे, किल्ले आणि ऐतिहासिक वस्तू संवर्धनाविषयी मंत्रालयात मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी घेतली. बैठकीला मैत्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्वचे संचालक तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे कला अकदामीच्या संचालिका मिनल जोगळेकर, सांस्कृती संचालक विभिषण चवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपला महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे जतन संवर्धनाबाबत योग्य नियोजनासाठी बृहत् आराखडयाची आवश्यकता असून कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या आराखड्यात राज्य संरक्षित वारसा स्थळांबरोबरच राज्य संरक्षित नसलेल्या ३५० किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात यावा. १५ डिसेंबरच्या अगोदरच आराखडा तयार करताना इतिहास, वास्तुशास्त्र, पुरातत्त्व, संवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ञांची नेमणूक करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुसंगत आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

आराखड्यावर निधी उभारणे

राज्य सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, मित्रा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा राज्याचा हा बृहत् आराखडा आणि एकात्मिक आराखडा करून, यापुढे त्या आराखड्यावर निधी उभारणे या सगळ्यांप र्यंतचा रोडमॅप या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामध्ये ११ गडकिल्ले आपले महाराष्ट्रातले आणि एक तामिळनाडूमधला हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गडकिल्ले युनेस्कोत गेल्यानंतर, त्याला जागतिक वारसा मिळाल्यानंतर, पूर्ण राज्याचा असा एक मोठा आराखडा बनवण्याचे कार्य आजपासून आपण सुरू करतो आहोत, असे मंत्री शेलार यांनी सांगितले. या कामात सर्व नागरिकांना, सर्व पर्यटनप्रेमींना, सर्व किल्ले आणि गड याच्या संवर्धनासाठी मदत करणाऱ्या सर्व संस्था, यांचेही मार्गदर्शन व मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

तीन जिल्ह्यांचे पर्यटन वाढविण्याचे ध्येय

पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तू संवर्धन आणि सांस्कृतिक प्रसिद्धीसाठी डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनेशन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून या जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा एकात्मिक बृहत् आराखडा स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये या वास्तूंचे जतन, संवर्धन, देखभाल आणि पर्यटन वाढविणे याचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment