
नवीन बस पुरवाव्यात अशी सरनाईक यांच्याकडे मागणी
पालघर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि सेवा सुविधा याबाबत मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा सुविधा आणि प्रशासकीय प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. पारस संजय सहाणे यांनी केली. त्याचबरोबर आदिवासी बहुल, ग्रामीण आणि गोरगरीब जनतेचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड या दुर्गम भागांमध्ये दळणवळणाचे एकमेव साधन असलेल्या “लालपरी” एस.टी. बससेवेची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या भागांमध्ये अनेक नागरिक एस.टी. बससेवेवरच अवलंबून असल्याने नवीन बस मंजूर करण्याची तातडीची गरज असल्याचेही ॲड. पारस सहाणे यांनी नमूद केले. परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आदिवासी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे हे सरकारचे प्राधान्य असून, नागरिकांना चांगली व वेळेवर बससेवा मिळावी यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.