Thursday, October 16, 2025

शेतकऱ्यांची दिवाळी गोड; आंबा-काजू नुकसान भरपाईपोटी ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू

शेतकऱ्यांची दिवाळी गोड; आंबा-काजू नुकसान भरपाईपोटी ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार - पालकमंत्री नितेश राणे

शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणीही नाही

प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली कानउघडणी

सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास आम्ही यशस्वी झालो, याचा आनंद आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यपद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,असे सांगत प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्री नितेश राणे यांनी कानउघडणी केली. शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये आंबा काजू ची २०२४-२५ विमा नुकसान भरपाई वितरण सुरू करण्यात आली आहे. त्या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि भारतीय कृषी बीमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबा काजू २०२४-२५ विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला यावेळी पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, अरुण नातू, उमाकांत पाटील, विमा कंपनीचे बी प्रभाकर, शेतकरी, विमा कंपनी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे म्हणाल्या की, फळपीक विमा योजना २०२४- २५ मध्ये जिल्ह्यातील ४३,२१९ शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर करण्यात आली. १७,५७७ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना ९० कोटी रुपयांची आंबा काजू विमा नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्यात ७४ कोटी रुपयांचा क्लेम मंजूर झाला आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश दिले.

अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, प्रशासन आणि विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फळपीक विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम आज जिल्ह्यात संपन्न झाला. असा एकत्रिक कार्यक्रम हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

पालकमत्री नितेश राणे म्हणाले की, शेतकऱ्यांची खरी बाजू जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर मी स्वतः कृषी मंत्री आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून दिली. शेतकऱ्यांचा हक्क त्यांना मिळायलाच हवा, अशा स्पष्ट सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या,” असे त्यांनी नमूद केले.

विमा रक्कम मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या असतील, तर त्या पुढील काळात होऊ नयेत याची खबरदारी कृषी विभाग आणि विमा कंपनी दोघांनीही घ्यावी अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली.

शेतकऱ्यांपेक्षा आपल्याला मोठा कोणी नाही

जिल्ह्यातील शेतकरी प्रामाणिक आहेत, कर्ज फेडतात, मेहनतीने शेती करतात. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नये. विमा कंपनीने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणीही नाही,” असेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment