Wednesday, October 15, 2025

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही ठेवले बोट; विरोधकांना सुनावले खडेबोल

सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवार, १५ ऑक्टोबर) सोलापूर-मुंबई विमानसेवेचे लोकार्पण झाले. या सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या दोन दिवसांतील कृतींवर कठोर शब्दांत निशाणा साधला. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि आज (बुधवारी) राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विरोधकांनी (MVA) घेतलेल्या भेटींवरून त्यांनी विरोधकांना अक्षरश: सोलून काढत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

विरोधकांना 'महाभाग' असे संबोधत फडणवीस म्हणाले की, "इतके गोंधळलेले विरोधक मी माझ्या जीवनात पाहिले नाहीत. एवढे मोठे मोठे नेते असतानाही त्यांना कोणाकडे गेले पाहिजे, कायदा काय आहे, याची सुद्धा माहिती नाही, असे वाटते." मात्र, त्यांना सर्व माहीत असून, केवळ निवडणुकीत हारल्यानंतर एक 'समज' निर्माण करण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या भेटीवर फडणवीसांचा निशाणा

फडणवीसांनी विरोधकांच्या गोंधळावर नेमके बोट ठेवले. ते म्हणाले, "मंगळवारी हे महाभाग चोक्कलिंगम यांच्या भेटीला गेले होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळा कायदा असून, त्यातून वेगळा वैधानिक निवडणूक आयोग (स्टेट इलेक्शन कमिशन) तयार झाला आहे. तो आयोग दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यावर कायद्याने पूर्ण नियंत्रण त्यांना देण्यात आले आहे, तो राज्य सरकारकडे सुद्धा नाही."

ते पुढे म्हणाले की, काल चोक्कलिंगम यांना भेटल्यावर त्यांच्या (विरोधकांच्या) लक्षात आले की, आपल्याला दिनेश वाघमारे यांना भेटायचे होते. मग त्यांनी थातूरमातूर चर्चा करून सांगितले की, हे निवडणूक अधिकारी त्या निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावणार आहेत. पण एका वैधानिक आयोगाच्या अधिकाऱ्याला दुसऱ्या वैधानिक आयोगाच्या अधिकाऱ्याला बोलावण्याचा अधिकार नाही, कारण हे दोघेही पूर्णपणे वेगळे आहेत.

'पराभव स्वीकारा, जनतेत जा'

विरोधकांनी दिनेश वाघमारे यांची भेट घेतल्यानंतरही त्यांना काय मागणी करावी हे समजले नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला. ते म्हणाले, राज्य निवडणूक आयोग संपूर्ण निवडणुका घेतो आणि सर्व अधिकार त्यांना आहेत. ते लोकसभा, विधानसभेची मतदार यादी स्वीकारतात आणि त्यावर सर्वांना आक्षेप नोंदवण्याची, नावे वगळण्याची (Addition/Deletion) संधी देतात. जर यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी त्या संधीच्या काळात पुरावे देऊन बदल केले पाहिजेत.

"काहीही करायचे नाही, कायदा समजून घ्यायचा नाही, पण केवळ 'नरेटिव्ह' (कथा) तयार करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.

मतदार यादी आणि शरद पवारांवर टिप्पणी

मतदार यादीतील 'डुप्लिकेट' नावांच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, "ही डुप्लिकेट नावे आज पहिल्यांदा आहेत का? गेली २० वर्षे ती नावे आहेत. आम्ही अनेकदा त्यावर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे काहीतरी काढून त्यावर प्रश्न विचारणे योग्य नाही. त्यांनी आता पराभव स्वीकारावा, जनतेत जावे आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहावे."

विरोधकांचा भारतीय संविधानावर आणि संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही, केवळ नरेटिव्ह तयार करण्याचे काम आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांनी विरोधकांच्या दोन दिवसांच्या चकरांना 'फियास्को' (अपयश) ठरवले.

शेवटी, फडणवीस यांनी शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही बोट ठेवले. ते म्हणाले, "ज्यांना या सगळ्याची कल्पना आहे, ते शरद पवार आहेत. कालच त्यांच्या लक्षात आले म्हणून आज ते विरोधकांसोबत गेले नाही," असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >