
मुंबई: दिवाळी अगदी तोंडावर आलेली असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. बेस्ट उपक्रम आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या हजारो कामगारांनी वाढीव बोनसच्या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात मुंबई शहर आणि उपनगरात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बोनसच्या मागणीसाठी केवळ बेस्टच नाही, तर उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही आंदोलनाची तयारी करावी लागत आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे.
युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी थेट इशारा दिला आहे. त्यांच्या मागणीनुसार, बेस्ट उपक्रमाने ८.३३ टक्के आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस द्यावा, अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे. वाढीव बोनसच्या मागणीवर दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी ठाम असून, या मागणीवर चर्चा करण्यासाठी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
बेस्ट उपक्रमाची स्थिती आणि मागणी
बेस्ट उपक्रमाने गेल्या काही वर्षांत परिवहन, अभियांत्रिकी, सामान्य प्रशासकीय विभाग आणि वीज पुरवठा विभागातील सुमारे १५ हजार स्थायी पदे रिक्त ठेवली आहेत. या रिक्त पदांवर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच कायम पदावर असलेल्या हंगामी कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. या माध्यमातून बेस्ट उपक्रमाने कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे, त्यामुळे कामगारांना वाढीव बोनस मिळाला पाहिजे, अशी मागणी विठ्ठलराव गायकवाड यांनी केली आहे.
याशिवाय, बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार १ एप्रिल २०१६ पासून प्रलंबित आहे. औद्योगिक न्यायालयाने ८.३३ टक्के दराने दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार बोनसचे वाटप झाले नाही, तर आंदोलन अटळ आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
अदानी कंपनीतील कामगारांची मागणी
अदानी कंपनीच्या आस्थापना विभागातील तीन हजार स्थायी पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबलेली आहे, आणि कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम पदावर सामावून घेण्यात आलेले नाही. यामुळे अदानी कंपनीनेही कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे. वेतनवाढीचे दोन करार न्यायालयात प्रलंबित असताना, कंपनीला दरवर्षी सरासरी दोन हजार कोटी रुपयांचा फायदा होत आहे. त्यामुळे स्थायी आणि कंत्राटी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी युनियनची मागणी आहे. या मागणीवर कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईतील कामगारही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.