
नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कंपनी पुढील पाच वर्षांत (२०२६-२०३०) सुमारे $१५ अब्ज (अंदाजे ₹१.२५ लाख कोटी रुपये) गुंतवणार असून, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ( Vizag) येथे गिगावॅट-स्केल क्षमतेचे देशातील पहिले एआय केंद्र (AI Hub) स्थापन करणार आहे.
गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात ही ऐतिहासिक घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण, अश्विनी वैष्णव, तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि आयटी मंत्री नारा लोकेश यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ही गुंतवणूक भारताच्या "विकसित भारत २०४७" या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, ती देशात एआय-आधारित तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी निर्णायक ठरेल. त्यांनी पंतप्रधान मोदींशी याविषयी चर्चा केल्याचेही नमूद केले.
Great to speak with India PM @narendramodi @OfficialINDIAai to share our plans for the first-ever Google AI hub in Visakhapatnam, a landmark development.
This hub combines gigawatt-scale compute capacity, a new international subsea gateway, and large-scale energy infrastructure.… — Sundar Pichai (@sundarpichai) October 14, 2025
या एआय हबमुळे संपूर्ण भारतातील स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कमी विलंब सेवा आणि अधिक जलद डेटा प्रक्रिया मिळणार आहे. अदानी ग्रुप आणि एअरटेल यांसारख्या भागीदारांसोबत गुगल ही केंद्रे विकसित करणार आहे.
समुद्राखालील केबलमुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नव्या डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना
ही गुंतवणूक केवळ डेटा सेंटरपुरती मर्यादित नसून, गुगलने विशाखापट्टणममध्ये नवीन आंतरराष्ट्रीय समुद्राखालील केबल लँडिंग स्टेशन उभारण्याचीही घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि चेन्नई-मुंबईच्या विद्यमान मार्गांना पूरक अशी मार्ग विविधता व लवचिकता प्राप्त होईल.
डेटा सेंटरच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी, गुगल स्थानिक पातळीवर स्वच्छ ऊर्जा निर्मिती, नवीन ट्रान्समिशन लाईन्स आणि ऊर्जा साठवण प्रणाली विकसित करणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधाही बळकट होतील.
पंतप्रधान मोदींनी गुगलच्या या निर्णयाचे स्वागत करताना लिहिले, "गिगावॅट-स्केल डेटा सेंटर पायाभूत सुविधा असलेली ही गुंतवणूक "विकसित भारत" घडवण्याच्या आपल्या उद्दिष्टाशी पूर्णपणे जुळणारी आहे. ही गुंतवणूक तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सर्वांसाठी उपलब्ध होईल, नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधनं मिळतील, देशाची डिजिटल अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीचं स्थान मिळवता येईल." मुख्यमंत्री नायडू यांनी याला "भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात" असे संबोधले.
Delighted by the launch of the Google AI Hub in the dynamic city of Visakhapatnam, Andhra Pradesh.
This multi-faceted investment that includes gigawatt-scale data center infrastructure, aligns with our vision to build a Viksit Bharat. It will be a powerful force in… https://t.co/lbjO3OSyMy — Narendra Modi (@narendramodi) October 14, 2025
भारतासारख्या मोठ्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेत, गुगलची ही गुंतवणूक एक मैत्रीपूर्ण आणि परिवर्तनकारी टप्पा आहे. यामुळे भारतात एआय-आधारित सेवांचा वेग वाढणार असून, देशाचा डिजिटल भविष्यासाठीचा पाया अधिक मजबूत होणार आहे.