
जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ते जयपूर येथील सभेला संबोधित करताना बोलत होते.
अमित शाह म्हणाले, "आज चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावाचा भूमिपूजन समारंभ झाला. रायझिंग राजस्थान समिट सुरू असताना मीही येथे होतो. ३५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, पण किती अंमलात आणले जातील, अशी अशोक गेहलोत यांची टिप्पणी मी वाचली? त्यावेळी आम्ही कोणालाही उत्तर दिले नाही. आज मी गेहलोत यांना सांगू इच्छितो की हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो.”
पुढे ते म्हणाले, इतक्या कमी वेळात, भजनलाल सरकारने ३५ लाख कोटी रुपयांपैकी ७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार अंमलात आणले आहेत याचा मला आनंद आहे. ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. देशभरात होणाऱ्या गुंतवणूक शिखर परिषदांमध्ये सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा सरासरी दर भजनलाल सरकार ओलांडेल असा मला पूर्ण विश्वास आहे.
अमित शाह यांनी जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (जेईसीसी) येथे तीन नवीन फौजदारी कायद्यांवरील राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट २०२४ अंतर्गत प्राप्त झालेल्या ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांमधून अमित शहा यांनी पायाभरणी केली. अमित शहा यांनी सुमारे ९,६०० कोटी रुपयांच्या १,१०० विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील केले. कार्यक्रमात, पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत १५० युनिट मोफत वीज योजनेसाठी नोंदणी देखील सुरू करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन महिन्यांत तिसऱ्यांदा राजस्थानला भेट देत आहेत. शहा यांनी यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी जोधपूरला भेट दिली होती, जिथे त्यांनी रामराज नगर चोखा येथील पारसमल बोहरा मेमोरियल कॉलेजच्या इमारतीची पायाभरणी केली होती. ही भेट २२ दिवसांपूर्वी झाली होती. अमित शहा यांनी १७ जुलै रोजी जयपूर येथे सहकार परिषदेचे उद्घाटन केले. या वर्षी ६ एप्रिल रोजी त्यांनी कोटपुतली येथील पाओटा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.