
मुंबई : नुकतेच 'दशावतार', 'कांतारा' यांसारखे मातीशी जोडलेले सिनेमे आपल्या भेटीला आले. त्यात आता गोंधळ या सिनेमाचीही भर पडणार आहे. काही सेकंदाच्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. दशावतार प्रमाणे गोंधळ सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला खेळ आहे इथल्या लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. कर्नाटकाच्या २० टक्के भागात 'कांतारा' हि संस्कृती जपली जाते, तर संपूर्ण कोकणात 'दशावतार' आणि ८० टक्के महाराष्ट्रात 'गोंधळ' हा खेळ ही संस्कृती जपली जाते.
कांतारा आणि दशावतार या सिनेमांनी आपल्या दाखवून दिलं कि प्रेक्षक हा किती पुढारलेला असला तरी त्याची नाळ मातीशी अजूनही जुळलेली आहे. गोंधळ सिनेमा हाच वारसा जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचे सुंदर सादरीकरण करणार आहे. टिझर मधूनच पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यायचा सुंदर संगम दिसून येत आहे. मुळात नवीन जोडप्यांच्या सुखासाठी लग्नानंतर देवाचा किंवा देवीच्या गोंधळ मांडला जातो.या सिनेमात तसंच काहीसं नवरा नवरीच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलघडणारी ही कथा काहीतरी वेगळंच गूढ आणि रहस्य घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एका मुलाखतीत चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष डावखरे म्हणाले "गोंधळ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि श्रद्धेचे दर्शन आहे. कांतारा ने आपल्या लोककलेला नवा आयाम दिला तसाच गोंधळ महाराष्ट्रातील श्रद्धा, गुढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमच उद्धिष्ट हेच आहे की ही माती, हा रंग, आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची आहे.
डावखरे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद संतोष डावखरे यांनी लिहिला असून चित्रपटाला पदमविभूषण इलैयाराजा यांनी संगीत दिलं आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखरे असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगोश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर आणि ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.